मुंबई | कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यासाठी, गणेशभक्तांना पास मिळवण्यासाठी यंत्रणाही उभी करण्यात येत आहे.
२३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे.
त्यासाठी "गणेशोत्सव २०२५ कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. गणेशभक्तांना हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत.
शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने ते पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारचा हा निर्णय कोकणात जाणार्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच, गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत करणारा आहे. त्यामुळेच, गणपती बाप्पा मोरया... जयघोष आता कोकणला जाणार्या मार्गावर पाहायला मिळेल.