मुरुड जंजिरा | मुरुड तालुयातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर अंतर्गत ते जेट्टीपर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
याला तीन महिने उलटले आहेत. मात्र केवळ चौकशी करु, असे सांगून वेळ मारुन नेली आहे. दोन वर्षे उलटले तरी, या रस्त्याच्या दुर्दशेतून सुटका होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी नवीन पर्यटन जेटी तयार झाली’ परंतु खराब रस्ता सुस्थितीत कधी येणार? असा सवाल पर्यटकांमधून उपस्थित केला जात आहे.
मुरुड खोरा बंदर येथील मुख्य रस्त्यापासून ते खोरा बंदर कार्यालयापर्यंत अंतर्गत रस्त्याचे काम तसेच जेट्टी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांकरिता शासनाने करोड रुपये खर्च करुन ठेकेदाराकडून काम पूर्ण करुन घेतले. परंतु हे काम सहा महिनेही टिकू शकले नाही. रस्त्यामधून सिमेंटचा भुसा, खडी बाहेर येऊन रस्त्या पावसाने धुवून गेला आहे. सदर कामाची वस्तुस्थिती पाहता संबंधित ठेकेदाराने फक्त पैसे लाटण्याच्या उद्देशाने हे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला जात आहे.
रस्त्यावरून चालत असताना बाजुने एखादी बाईक जरी गेली तरी रस्त्यावरील घाण उडून नाका, तोंडात जात आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. रस्त्यावर पाणी भरले असून, खड्ड्यांची तळी होत आहेत. पुढील महिन्यापासून पर्यटक येण्याची सुरुवात होणार आहे आणि याच खड्डेमय रस्त्यातून पर्यटकांना प्रवास करावा लागणार आहे. पर्यटकांची संख्या वाढवावी व त्याचा प्रवास सुखाचा प्रवास व्हावा, याकरिता शासनाने करोड रुपये खर्च करून हा रस्ता बनविला; परंतु हा रस्ता ठेकदराच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या आत उखडला गेला.
ह्या रस्त्यावर टाकण्यात आलेले स्पीडब्रेकर अतिशय चुकीचे बनवण्यात आलेत. छोटे आणि उंच गतिरोधकांमध्ये वाहने जोरात आपटून अपघाताची भीती निर्माण झाली आहे. अनेक गाड्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याच्या तक्रारी होत आहे. परंतु अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून काहीही दखल घेतली जात नाही. वाहनचालक, प्रवाशांच्या समस्यांबाबत कोणालाही सोयरेसुतक राहिलेले नाही. शाससनाचा करोड रुपयांचे नुकसान करणार्या ठेकेदार व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी व ठेकेदराला काळ्या यादीत टाकावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
खोरा खराब रस्त्याचे निवेदन मिळताच आम्ही पाहणी केली. नक्कीच रस्ता खराब झाला आहे. रस्ता काँक्रीटीकरण होत असताना प्रवासी वाहतूक सुरु होती, त्याचा फटका या रस्त्याच्या कामाला बसला आहे. रस्ता आता खराब झाला आहे. ठेकेदाराचे अनामत रक्कम आमच्याकडे सील केली आहे.
आता पावसाळ्यात जंजिरा किल्ल्याची वाहतूक बंद होते. त्यावेळी रस्ता पूर्ण बंद करून रस्त्यावर काँक्रीटीकरणाचा १ कोट मारून पूर्ण २१ दिवस क्युअरिंग करण्यास सांगण्यात आले आहे. काम सुरु झाले नाही. -सुधीर देवरे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई