नागोठणे | मुसळधार पावसाने गुरुवारी रायगड जिल्ह्यासह नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे चार दिवसांपासून दुथडी भरून वाहणार्या नागोठण्यातील अंबा नदीने (१९ जून) धोक्याची पातळी ओलांडली. अगदी काही तासांतच नागोठणे एस.टी.स्थानक, आठवडा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक व मुख्य बाजारपेठ, बंगले आळी, श्री मरिआई मंदिरासमोरील मिनीडोर रिक्षा स्टँड व श्री मरिआई मंदिर परिसर, नागोठणे कोळीवाडा, हॉटेल लेक व्ह्यू समोरील परिसरात तसेच नागोठणेजवळील शेतपळस गावातील सखल भागात पूराचे पाणी शिरले.
अतिवृष्टीमुळे नागोठणेसह विभागात तसेच पाली, खोपोली या ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अधिक वाढल्याने अंबा नदीच्या पात्रात वाढ होत अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि त्यानंतर नागोठणे शहर व परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. अतिवृष्टीमुळे दरवर्षी नागोठणे येथील अंबा नदीला जुलै, ऑगस्ट महिन्यात येणारा पूर नागोठणेकर नागरिकांना, दुकानदार तसेच व्यापार्यांना यंदा जून महिन्यांतच अनुभवायला मिळाला.
यामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडीक, उपसरपंच अखलाक पानसरे यांच्यासह डॉ. मिलिंद धात्रक, ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या पूनम काळे, अमृता महाडीक, भाविका गिजे, सुप्रिया काकडे तसेच रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनिल गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी सूचना केल्या.शहरातील विशाल मेडिकलसमोर असलेल्या मिनीडोर रिक्षा स्टँडच्या परिसरात तसेच नागोठणे एस.टी.बस स्थानकासामोरील परिसरात पूराचे पाणी आल्याने याचा वाहतुकीवर खूप मोठा परिणाम झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
पुरामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाल्याने या परिसरातील सर्वांनाच या पूराच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. तर अंबा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नागोठणे कडून वरवठणे गावाकडे जाणारा रस्ता व महामार्गावरुन नागोठण्यात येणार्या रस्त्यावर मरीआई मंदिरासमोर भरलेल्या या पूराच्या पाण्यामुळे हा रस्ताही पूर्णपणे बंद झाला होता. तर दुसरीकडे अंबा नदीला आलेल्या या पुरामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती.
याचबरोबर वाकण पाली राज्यमार्गावर अंबा नदी पात्रातील पाणी रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान, रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांनी अंबा नदीला आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. नागोठणे शहर व परिसरात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे पूर आलेल्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी हे स्वतः आपल्या कर्मचार्यांसह पाणी आलेल्या ठिकाणी उपस्थित होते.
पूर आल्याने विद्युत पुरवठा खंडित
अतिवृष्टीमुळे येथील अंबा नदीच्या पात्रातील पुराचे पाणी नागोठणे शहरात शिरल्याने कोणतीही अघटीत घटना घडू नये, यासाठी या सर्व भागातील विद्युत पुरवठा तत्काळ बंद करण्यात आला होता.
दरवर्षीपेक्षा लवकरच सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्रच हाहाकार माजविला आहे.अशातच गेली काही दिवस सुरु असलेल्या धुवाँधार मुसळधार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीच्या पात्रात कमालीची वाढ झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाकडून अंबा नदी काठावरील सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व सर्व कर्मचारी पूर आलेल्या परिसरात गस्त घालत असून मी स्वतः पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.- सुप्रिया संजय महाडिक, सरपंच, नागोठण.