शिवसृष्टीसाठी निधी कमी पडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10 Jun 2025 18:09:03
mahad
 
महाड | ३५२ वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर शिवरायांचा झालेला राज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान असून या रायगडच्या पवित्र भूमीत शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याने आपण सर्व भाग्यवान आहोत, असे प्रतिपादन करीत पाचाड येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीला निधीची कमतरता भासणार नाही, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
 
किल्ले रायगडावर तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, खा. श्रीरंग बारणे, आ. महेंद्र थोरवे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी किशन जावळे, एस पी आंचल दलाल, युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास व हजारो शिवभक्त उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांची महती सांगताना उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी शिवरायांची जयंती अनेक देशात साजरी केली जाते.
 
युरोप विद्यापीठात शिवछत्रपतींचे चरित्र शिकवले जाते. शिवरायांचे नांव हे आपले प्राण व श्वास आहे. शिवरायांच्या आदर्शावरच महाराष्ट्राचे सरकार चालले असून राज्यातील गडकिल्यांचे संवर्धन व त्याठिकाणचे अतिक्रमणहटविण्यासाठी हे सरकार कटिबध्द आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीस शिवराज्याभिषेकसोहळ्याचे स्वागताध्यक्ष तथा रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी आळंदी, पंढरपूर तुळजापूर सिद्धी विनायकाची वारी जरूर करा, परंतु जन्माला येऊन किल्ले रायगडची वारी प्रत्येकाने जरूर करावी, असे आवाहन केले.
 
देवधर्मासाठी लढून सुराज्य स्थापन करणार्‍या छत्रपती शिवरायांचे नांव५० हजार वर्षांनंतरही कायम राहील, असेही ते म्हणाले. तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त स्वखर्चाने आले आहेत. त्यांना कुठल्या साखर कारखाना अथवा कंपनीने मदत केलेली नाही, असा टोला लगावत तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या सोहळ्याला किती गर्दी होईल? अशा वल्गना केल्या जात होत्या; मात्र शरीरात प्राण व श्वास असेपर्यंत शिवभक्त तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा करतील, असा विश्वास ना. गोगावले यांनी व्यक्त केला.
 
तिथीनुसार साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यास शासन मान्यता मिळाली असून ५ कोटी निधी तारीख व तिथीनुसार होणार्‍या सोहळ्यासाठी मंजूर केलेला आहे त्यात आणखी ३ कोटी वाढवून द्यावेत, अशी मागणी ना. गोगावले  यांनी केली. गेली अनेक पिढ्या किल्ले रायगडावर वास्तव्य करून गडाची राखण व गडावर येणार्‍या शिवभक्तांची न्याहरी, जेवणाची व्यवस्था करणार्‍या धनगर समाजाला या ठिकाणाहून न हलवता त्यांना गडावर चांगली पक्की घरे शासनाने बांधून द्यावीत, अशी मागणी गोगावले यांनी केली.
 
रविवारी शिवप्रभूंची तुला करण्यात आली. त्याचबरोबर महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी शिरकाई देवीला केलेला नवस फेडण्यात आला. सोमवारी सकाळी ध्वजपुजन, पालखीचे प्रस्थान, नगारखानासमोर ध्वजारोहण, शिवराज्याभिषेक सोहळा, पालखी मिरवणुकीचा शाही सोहळा, त्यानंतर महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  
 
Powered By Sangraha 9.0