अलिबाग | रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर नाराज आहेत. प्रकल्पग्रस्तांबाबत उदय सामंत यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राजा केणी यांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे उद्योगमंत्री दुर्लक्ष करत असल्याने, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांचे खाते असणार्या एमआयडीसी कार्यालयावर येत्या १५ मे रोजी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नाही. मात्र तरीही पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी ३५६ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकर्यांच्या जमिनीतून पाइपलाइन जाणार आहे त्या शेतकर्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेले नाही.
शेतकर्यांना देशोधडीला लावून उद्योगांना पायघड्या घालणार्या या प्रकरणात राज्याच्या उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप खारेपाट विभाग शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे. प्रकल्पासाठी एकरी ९६लाख ६९ हजार तर हेक्टरी २ कोटी ४१ लाखांचा दर देऊ केला आहे. जो शेतकर्यांना मान्य नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला मिळावा, अशी मागणी शेतकर्यांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र त्याकडे उद्योग विभागाने दुर्लक्ष केले आहे.
दुसरीकडे शेतकर्यांशी कुठलीही चर्चा झाली नसताना दुसरीकडे त्यांनी शेतकर्यांची पिकती शेती काहीही मोबदला न देता बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळेही शेतकरी संतापले आहेत. प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात येत असून एकूण एमआयडीसी फेज टू अंतर्गत ७३६ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी नागोठणे ते बांधण या २८ किलोमीटर लांबीची भली मोठी पाइपलाइन टाकली जाणार आहे.
यासाठी १६७ कोटी ०८ लाख २५ हजार २५४ रुपये खर्चून पाईपलाईन टाकण्याचे काम व हे पाणी उचलण्यासाठी बांधण येथे १८९ कोटी ७० लाख ३५ हजार ३२६ रुपये खर्चुन जॅकवेल बांधली जाणार आहे. यासाठीची मोजणी करुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. एकीकडे खारेपाट ग्रामस्थ पाणीटंचाईने व्याकूळ आहेत. तर दुसरीकडे शासनाने त्यांना पाणी देण्याऐवजी सिनारमन्स या प्रस्तावित उद्योगासाठी पाणी देण्याचा घाट उद्योग विभागाने घातला आहे.
राज्याच्या उद्योग विभागाची ही संशयास्पद भूमिका असल्याचे राजा केणी यांनी म्हटले आहे. त्यामुळे नव्या पाईपलाईन टाकण्याचा कामाला विरोध दर्शवला आहे. शेतकर्यांनी केलेल्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; अन्यथा १५ मे रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अलिबाग येथील कार्यालयावर शेतकर्यांच्या आक्रोश मोर्चाला सामोरे जा, असा इशारा केणी यांनी दिला आहे.