पनवेल | मे महिन्याच्या सुट्टीत आपल्या कुटुंबियांसह कोकणात गावाला निघालेल्या चाकरमान्यांच्या खाजगी बसला रविवारी (४ मे) रात्री पनवेलजवळील कर्नाळा येथे अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोनजण गंभीर झाले आहेत. अपघातानंतर बसचालक फरार झाला होता. त्याला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे.
ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची बस रविवारी (४ मे) दहिसर ते सावंतवाडी असा प्रवास करीत होती. बसमध्ये एकूण ४९ प्रवासी होते. ही लक्झरी बस रात्री पनवेलजवळील कर्नाळा खिंडीत आली असता तिला अपघात झाला. चालकाने अतिवेगाने बस चालवल्याने ती पलटी झाली. या अपघातात अमोल कृष्णा तळवडेकर (वय ३० रा.कोंडाये, राजापूर, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी आहेत. जखमींपैकी दोघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी (दि. ५ मे) सकाळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली. दरम्यान, अपघातानंतर चालक पळून गेला होता. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले.