माथेरानमधील वीज प्रश्नांसाठी राजकीय इच्छशक्तीची गरज

By Raigad Times    06-May-2025
Total Views |
 KARJT
 
कर्जत | माथेरान शहरातील वीज प्रश्न गेले वर्षभर चर्चेत आहे. शहरातील वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी माथेरानमध्ये अनेक उपोषणे झाली आहेत. मात्र तरीदेखील अनेक प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून काही प्रकरणे मंजूर होऊन निधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे माथेरानचा वीज प्रश्न सुटण्यासाठी राजकीय इच्छशक्तीची गरज जाणवत आहे.
 
माथेरानमधील येणार्‍या पावसाळी काळाते संभावित खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याबाबत येथील भौगोलिक परिस्थिती पाहता अरुंद वळण व तीव्र चढाचा घाट, डोंगर दरी, घनदाट जंगल असल्यामुळे पावसाळ्यात विद्युत वाहिनीवर झाडे कोसळणे, कंडक्टर तुटणे, पोल पडणे, इन्सुलेटर फुटणे, माकडे, पक्षी हे वाहिन्यांना चिकटल्याने विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यात घनदाट झाडी, डोंगर दरीतून लाईन पेट्रोलिंग करणे अतिशय अवघड असून वाहतुकीचे साधन तसेच भ्रमणध्वनीचे नेटवर्कही उपलब्ध नसल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विलंब होऊ शकतो.
 
दुसरीकडे पावसाळ्यातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी या कार्यालयाकडून माथेरान मधील १५ किलोमीटर लघुदाब भूमिगत विद्युत वाहिनी, ५० मिनी फिडर पीलर व दस्तुरी ते माथेरान पर्यंत ४ किलोमीटर उच्च दाब भूमिगत विद्युत वाहिनीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत. शासनाकडून शहरातील तीन महत्वाच्या कामांसाठी निधी मंजूर करून आणल्यास माथेरान मधील ९० टक्के सुटणार आहे असा दावा महावितरण विरुद्ध सातत्याने उपोषण करणारे संतोष कदम यांनी व्यक्त केला आहे.