पेण| महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकात ऐन लग्नसराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झाले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन सोमवारी (५ मे) संध्याकाळी माणगाव येथे आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्या. त्याचा परिणाम एसटीच्या दैनंदिन फेर्यांवर झाला. पेण बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे.
या बस स्थानकातून दररोज मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच अलिबाग, मुरुड, महाड, माणगाव रोहा, येथे शेकडो प्रवासी नोकरी व शिक्षणानिमित्त प्रवास करतात. परंतु सोमवारी एसटी कामगार संघटनेचे अधिवेशन माणगाव येथे होणार होते. याकरिता पेण बस स्थानकातील अनेक चालक व वाहक तसेच कंट्रोलर यांनी एकदाच रजा टाकल्याने त्याचा परिणाम आगाराच्या दैनंदिन फेर्यांवर झाला. पेण बस स्थानकातून दररोज एकूण ५६ फेर्या चालविल्या जातात.
परंतु सोमवारी यापैकी १४ फेर्या रद्द करण्यात आल्याने ४२ फेर्या सकाळी सुरु होत्या. तर दुपारनंतर ग्रामीण भागातील तसेच नागोठणे, पाली, पनवेल, खोपोली या मार्गावरील देखील काही फेर्या चालक व वाहकांअभावी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ऐन लग्न सराई व सुट्टीच्या हंगामात प्रवास करणार्या प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. वास्तविक एसटी कामगार संघटनेचे हे राज्य अधिवेशन होते.
त्यामुळे राज्यातील चालक व वाहक व एसटी कर्मचारी या अधिवेशनाला उपस्थित राहिले आहेत. पेण आगारातील ५० चालक, वाहक व कंट्रोलर यांनी रजा घेतल्या. त्याचा मोठा परिणाम आगाराच्या उत्पन्नावर व जनतेच्या प्रावसावर झाला आहे. अशा प्रकारे एकदाच रजा घेऊन ऐन लग्नसराई व सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना वेठीस धरणे हे योग्य आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी संघटनेने केला आहे. दरम्यान, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून एवढ्या कर्मचार्यांना एकदाच रजा कशा दिल्या जातात? असा सवाल करत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.