खोपोली | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून खालापूर टोल नाका हद्दीत केलेल्या कारवाईत म्हशींना कोंबून भरलेले चार टेम्पो पकडले आहेत. प्रत्येक टेम्पोत २० म्हशी अशा चार टेम्पोमध्ये एकूण ८० म्हशींना निर्दयीपणे कोंबून कल्याण येथे नेले जात असताना ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, त्यामध्ये १२ म्हशी प्रवासादरम्यान दगावल्याचे निदर्शनास आले. गोरक्षकांनी खालापूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाका येथे संशयित टेम्पो थांबविण्यात आले. टेम्पो रस्त्याचे बाजूला घेतल्यानंतर टेम्पोवरील चालकास टेम्पोमध्ये काय आहे? याबाबत विचारणा केली असता त्याने त्यामध्ये म्हशी असल्याचे सांगितले. टेम्पोचा पाठीमागील पडदा उघडून पाहणी केली चारा, पाणी, हवा यांची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवटीने या म्हशींना कोंबून भरल्याचे दिसून आले.
चालकाकडे खरेदीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी वडगांव शेती उत्पन्न बाजार समिती वडगांव पेठ ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील खरेदीच्या पावत्या दाखविल्या. जनावरे खरेदी घेणार मोहम्मद वशीम कुरेशी, आक्रम अब्दुलगणी सय्यद (रा. कल्याण मुंबई) असे दिसून आले. आरटीओ व पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडील कोणताही वाहतूक परवाना न घेता त्यामध्ये प्रत्येक टेम्पोमध्ये २० म्हशी दाटीवाटीने भरुन नेल्या जात होत्या.
याप्रकरणी करीम कलीम कोशी (वय २८, रा. गोवंडी, शिवाजीनगर, लोटस कॉलनी मुंबई), हिदायत शहदाय अब्बास सय्यद (वय ४८, रा. गोवंडी मुंबई), फरान आस्लम आलवी (वय ३०, रा.गोवंडी, शिवाजीनगर लोटस कॉलनी मुंबई), रेहान आस्लम आलवी (वय २४, रा.गोवंडी मुंबई), प्रताप भिका चव्हाण (वय ६०, रा. गोवंडी टाटानगर), बबन बाळाराम कांबळे, (वय ६०, रा. सावरडे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), रमजान छेटु खान (वय ५१, रा. टाटानगर गोवंडी मुंबई) यांच्याविरूद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.