सोगाव | मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील जनजीवन विस्कळीत झाले असून, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी मंगळवारी (२७ मे) ग्रामपंचायत हद्दीतील किहीम आदिवासी वाडी व बामणसुरे आदिवासी वाडी येथे जाऊन तेथील नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
तसेच बेकायदेशीरपणे भराव व बांधकामे केलेल्या ठिकाणी पाणी भरल्याने नैसर्गिक मार्ग मोकळा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी तलाठी ललिता शिर्के व इतर महसुली तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह प्रत्यक्षात पाहणी करून संबंधित असलेल्या मालकांना मार्ग मोकळा करून होणार्या गैरसोयी दूर करण्यासाठी सूचना दिल्या.
यासोबतच किहीम आदिवासी वाडी व बामणसुरे आदिवासी वाडी येथील गरीब आदिवासी बांधवांच्या घरांची झालेली पडझड यांची पाहणी करून दिलासा देत त्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. मुसळधार पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे, आलेल्या पावसामुळे जागोजागी विद्युत पुरवठा खंडित होऊन मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.