अलिबाग | रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सद्याची पावसाची आकडेवारी पाहता संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष रहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल व साकाव आणि पाणी साठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा.
आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिले. यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा ही तटकरे यांनी यावेळी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली.
या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील यांसह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून मंत्री कु तटकरे म्हणाल्या की, आपत्तीच्या वेळी कु तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोख पणे पार पाडावी.
तसेच निश्चित कार्यपद्धती योग्यरित्या राबवावी.रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. मागील घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणीही दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाची पाहणी ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत करण्यात यावी. जी गावे दरडप्रवण क्षेत्रात येतात त्या ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात. या गावांची परिपूर्ण माहिती जिल्हा प्रशासनाकडे संकलित असावी.
अचानक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ मदत कार्य पोहोचविणे शक्य होईल असेही कु. तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व शाळा, रुग्णालये, पूल, साकाव, रस्ते यांचे प्राधान्याने स्ट्रक्चरल ऑडिट करावे. जेथे डागडुजी करणे शक्य आहे. तेथे तात्काळ दुरुस्ती करावी. जेथे दुरुस्ती करणे शक्य नाही तेथे पर्यायी व्यवस्था करावी. यामध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. यंदा अशी कुठलीही दुर्घटना घडल्यास संबंधित विभागास जबाबदार धरले जाईल.
तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल असेही कु तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. पावसाळ्याच्या पूर्ण कालावधीत जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी. रुग्णवाहिका वाहन चालकासह सुसज्ज असाव्यात. त्यांची आवश्यक दुरुस्ती तात्काळ पूर्ण करून घ्यावी. सर्व प्राथमिक केंद्रात मनुष्यबळ आणि औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पावसाळ्यात सर्प दंशाच्या मोठ्या प्रमाणावर दुर्घटना घडतात.