खोपोली | मे महिन्यात अति उष्णतेची लाट असली तरी याच महिन्यात सर्वात जास्त लग्न समारंभ होतात. सकाळच्या मूहर्त टाळत संध्याकाळच्या मूहर्तावर लग्न समारंभ आयोजित केले जातात. दोन्हीही यजमान गरीब असो की श्रीमंत, लग्न सोहळ्यातील सजावट, जेवणासाठी लाखोंचा खर्च केला जात असल्याचे दिसून येते.
परंतु मे महिना सुरू होताच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत लग्न सोहळ्यासाठी उभारले जाणार्या मंडपांचे लाखोंचे नुकसान होत असल्यामुळे यंदाच्या हंगामातील विवाह सोहळ्यावर पाणी फिरले असून नववधु आप्तेष्ट व नातेवाईक या सर्वांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
रायगड जिल्ह्यासह खालापूर तालुयात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वैशाख महिना सुरू असून सध्या सर्वत्र लगीनघाई दिसून येत आहे. खुली मैदाने तसेच लॉनवर लाखो रूपयांचे डेकोरेशन उभे केली जात आहे. नववधुवरांची फिल्मी स्टाईलने एन्ट्रीसह लग्न समारंभ साजरे होत आहे. लग्न सोहळा थाटात आणि हौसीने साजरे करण्याचे स्वप्न बघणारे नववधुवर डोळ्यादेखत पावसामुळे विवाह सोहळ्यावर पाणी फिरत असल्याचे पाहून अश्रू अनावरण होताना दिसत आहे.