पनवेल | शेकापचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे पुत्र प्रितम म्हात्रे यांच्यासह शेकापचे अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. म्हात्रे यांनी पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे शेकापला पनवेलमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार तसेच रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात जोरदार स्वागत केले. उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी पनवेल, उरण, खालापूरसह रायगड जिल्ह्यातील विविध भागातून शेकापसह अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीने जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीतही शेकापचा घात केला. या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शेकापचे अस्तित्व रसातळाला गेले. अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दुसर्या पक्षाची वाट धरली.
त्यामुळे आघाडीतून बाहेर पडून पक्ष वाढवायचा आग्रह जे.एम. म्हात्रे यांनी शेकाप नेत्यांकडे केला होता. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांचा पक्षाकडे मागणीचा रेटा राहिला. त्यांनी यासंदर्भात मध्यंतरी पक्षाची बैठक घेतली. त्यावेळी ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडा, आपण पक्ष वाढवू’ अशा स्पष्ट भाषेत सांगितले; मात्र तरीही त्यांना साथ न देण्याचा इरादा पक्षाने घेतला. त्यामुळे जे. एम. म्हात्रे यांनी अखेर आपला निर्णय जाहीर करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
मागील महिन्यात जयंत पाटील यांचे बंधू माजी आमदार पंडित पाटील, माजी मंत्री स्व. मिनाक्षी पाटील यांचे चिरंजीव व रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी हजारो समर्थकांसह भाजपात प्रवेश करत अलिबागमध्ये जोरदार धक्का दिला. त्यानंतर काही दिवसातच पनवेलमध्ये शेकापला मोठा दणका मिळाला. प्रभुदास भोईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेकाप या झटक्यातून सावरत नाही तोच जे.एम.म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांनी पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.