कर्जत | नवी मुंबई येथील दिघा गावातील वसाहतीत राहणारे अजय विष्णू रावत हे आपल्या चार मित्रांसह कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते. भोजन करून आंघोळीसाठी जवळील लघुपाटबंधारे प्रकल्प असलेल्या धरणावर गेले. यावेळी अजयला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो धरणाच्या पाण्यात बुडाला. शनिवारी (१० एप्रि) दुपारी तीन वाजता ही घटना घडली आणि रविवारी (११ एप्रिल) सकाळी नऊ वाजता त्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
दिघा गावातील अजय विष्णू रावत हे वाहतूक व्यवसाय करतात. त्यातील टुरिस्ट कार घेऊन आपल्या चार मित्रांसह कर्जत तालुक्यातील पाषाणे येथे नातेवाईक यांच्याकडे आले होते. शनिवारी दुपारी आपल्या नातेवाईक यांच्याकडे आले आणि तेथे भोजन उरकून आंघोळी करण्यासाठी जाण्यास निघाले. अजय यांचे नातेवाईक पाषाणे गावातील नवीन वसाहतीमध्ये रहायला आहेत आणि त्यांना त्या भागाची पूर्ण माहिती नसल्याने पाषाणे येथील लघुपाटबंधारे धरणाची खोली किती आहे? आणि नवीन पोहणारे यांच्यासाठी हे धरण धोकादायक आहे यांची माहिती त्यांना नव्हती.
त्यामुळे कोणतीही सुरक्षेची माहिती नसताना अजय रावत आणि त्यांचे चार मित्र हे पाषाणे येथील धरणावर अंघोळी करण्यासाठी दुपारी तीन वाजता पोहचले. त्या ठिकाणी दुपारची वेळ असल्याने आजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती आणि त्यामुळे कोणत्या भागात पाण्याची खोली अधिक आहे याची माहिती सांगण्यासाठी कोणीही उपलब्ध नव्हते. त्यामुळे पाषाणे धरणातील पाण्यात उतरलेला अजय रावत हा पाण्याच्या बाहेर आला नाही.
त्यामुळे त्याचे चारही मित्र घाबरले आणि तब्बल तासाभराने तअजय सोबत असलेल्या तरुणांनी जेवण ज्यांचे घरी केले त्यांच्या घरी जाऊन अजय पाण्यात बुडला असल्याची माहिती दिली.त्यानंतर साडे चार वाजता सर्व नातेवाईक हे धरणावर पोहचले आणि पुन्हा अजय रावत यांचा शोध सुरु झाला.मात्र त्याचा शोध लागत नसल्याने साडे पाच वाजता नेरळ पोलीस यांना कळविण्यात आले. नेरळ पोलीस ठाण्याकडून कळंब पोलीस चौकीचे उप निरीक्षक आर एल वसावे तसेच पोलीस नाईक निलेश कोंडार हे पाषाणे येथील धरणावर पोहचले.
तेथे पोलिसांनी स्थानिक आदिवासी लोकांच्या मदतीने अजय रावत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र तरीदेखील शोध लागला नसल्याने शेवटी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी खोपोली येथील अपघटग्रस्तांची टीम यांना तरुणाच्या बुडाल्याची माहिती दिली. रात्र झाल्याने अपघातग्रस्त टीम मधील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठलेकर आणि टीम यांनी आज सकाळी आठ वाजता पाषाणे धरण गाठले.
त्यानंतर पाण्यात उतरून या रेस्क्यू टीम ने शनिवारी दुपारी पाण्यात बुडालेल्या अजय विष्णू रावत वय २८ वर्षे याचा मृतदेह पाण्यात बाहेर काढला.नंतर सदर मृतदेह कळंब येथे शव विवच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे.संबंधित तरुणाच्या मृत्यूची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे आकस्मीक मृत्यू अशी करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार लोखंडे करीत आहेत.