जिल्ह्यात १७ सप्टेंबरपासून सेवा संकल्प अभियान

By Raigad Times    17-Sep-2026
Total Views |
 ALIBAG
 
 
अलिबाग | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत "सेवा संकल्प अभियान" राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.
 
रायगड जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे आणि तळागाळापर्यंत राबविण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्वसमावेशक आदेश जारी केले असून, जिल्हा तसेच तालुकास्तरावर नोडल व पर्यवेक्षण अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे.
 
"सेवा परमोधर्म” या संकल्पनेवर आधारित या अभियानात प्रशासकीय कामांना गती देणे आणि सामान्य नागरिकांपर्यंत योजनांचे लाभ शिबिरांच्या माध्यमातून एकाच छताखाली थेट पोहोचवणे, हा मुख्य उद्देश आहे.