बेणसे | अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे वाकण आणि वजरोली परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. या पुराच्या पाण्यात अडकलेल्या तब्बल २८ नागरिकांची रेस्क्यू पथकाने धाडसी बचाव मोहीम राबवत सुखरूप सुटका केली. रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वजरोली गावाजवळ काही बंगल्यांचे बांधकाम सुरू होते.
नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तेथे काम करणारे २० मजूर आणि नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले. तर दुसरीकडे वाकण नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये असलेले आठ जणही पुराच्या पाण्याने वेढले गेले. पाण्याचा वेग झपाट्याने वाढल्याने या सर्वांनी हॉटेलच्या छतावर आश्रय घेतला.
घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्था आणि रेस्क्यू पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुराच्या वेगवान प्रवाहाची पर्वा न करता त्यांनी जीवाची बाजी लावत बचावकार्य सुरू केले. अत्यंत अडकलेल्या २० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या बचावमोहीमेत दोन घटनातील एकूण २८ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.