नवी मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यातील वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्य जनतेवरील आर्थिक संकटाच्या निषेधार्थ ३ जून रोजी नवी मुंबई येथे भव्य राज्यव्यापी ‘रस्ता अडवा’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांच्या मालिकेतील हे सर्वात मोठे आंदोलन मानले जात असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो कार्यकर्ते, युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणार्या किंमतींमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर झाला आहे.
किराणा माल, भाजीपाला, गॅस सिलिंडर, औषधे, शिक्षण आणि प्रवास यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू व सेवांचे दर वाढल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. वाढती बेरोजगारी, उद्योगधंद्यांवरील आर्थिक ताण आणि शेतकर्यांच्या अडचणींमुळे राज्यात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पोर्शभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
येत्या ३ जून रोजी होणारे आंदोलन हे केवळ राजकीय आंदोलन नसून सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी उभारलेला लोकआवाज असेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड तसेच आमदार रोहित पवार यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
याशिवाय पनवेलच्या नगराध्यक्षा व पक्षाच्या राज्य उपाध्यक्षा भावना घाणेकर, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आमले, पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण, रायगड आणि नवी मुंबई परिसरातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी बुधवारी सायंकाळी नवी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीत आंदोलनाची रूपरेषा, जनजागृती मोहीम, प्रवास व्यवस्था, कार्यकर्त्यांचे नियोजन, सुरक्षितता व्यवस्था आणि विविध विभागांतील समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला नवी मुंबई, रायगड, पनवेल, उरण तसेच आसपासच्या भागांतील शेकडो पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित नेत्यांनी राज्यातील वाढती महागाई, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष आणि जनतेच्या मूलभूत समस्यांबाबत प्रशासनाची असंवेदनशील भूमिका यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने तातडीने पेट्रोल-डिझेल दरवाढ नियंत्रणात आणावी, महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने राज्यातील नागरिक, युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागाईविरोधात शासनाला जाब विचारण्यासाठी आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विेशास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.