महाराष्ट्राचे समुद्रावर शंभर वर्षे साम्राज्य राहील! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास

जेएनपीए येथे भारतातील सर्वांत मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन

By Raigad Times    05-Sep-2025
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | जेएनपीए आणि पीएसए इंडियाच्या सहकार्यामुळे देशातील सर्वांत मोठे कंटेनर हाताळणी केंद्र उभे राहिले असून, वाढवण बंदर कार्यान्वित झाल्यावर जेएनपीए जगामध्ये पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 
तसेच पुढील शंभर वर्षांसाठी महाराष्ट्र समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल, असेही ते यावेळी म्हणाले.जेएनपीए येथे भारतातील सर्वांत मोठ्या कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या सोहळ्याला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ.महेश बालदी, आ.प्रशांत ठाकूर, पराग शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
 
ALIBAG
 
पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवले जाणारे हे टर्मिनल १०० टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत असून, समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरुप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे. या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता ४.८ दशलक्ष टीईयू इतकी झाली असून, घाटाची लांबी २००० मीटरपर्यंत वाढली आहे. यात २४ घाट क्रेन आणि ७२ रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) यांचा समावेश आहे.
 
या फेज-२ विस्तारामुळे बीएमसीटीची क्षमता २.४ दशलक्ष टीईयूपासून दुप्पट होऊन ४.८ दशलक्ष टीईयू झाली आहे. हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे ६३ हून अधिक इनलँड कंटेनर डेपो (आयसीडी)शी जोडले गेले असून, हे भारतातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क आहे. जून २०२५ पासून हे टर्मिनल सुविधांसाठी तयार होते आणि आजच्या उद्घाटनामुळे राज्यातील लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला नवीन आयाम मिळणार आहे.
 
उद्योग तज्ञांनी या विस्ताराला गेम-चेंजर म्हटले आहे. अत्याधुनिक उपकरणे आणि बहुआयामी पायाभूत सुविधांसह, पीएसए मुंबई भारताच्या सागरी विकासाचा प्रमुख चालक बनण्यास सज्ज आहे. या उद्घाटनासह भारत जागतिक समुद्री अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यास पुढे सरसावत आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली, तर जेएनपीएचे प्रमुख उन्मेश वाघ यांनी टर्मिनलच्या विस्ताराबाबत प्रास्ताविक केले.
नवीन करारनाम्यांवर स्वाक्षर्‍या
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, जवाहरलाल नेहरु पोर्ट (जेएनपीए) येथील पीएसए मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे उद्घाटन गुरुवारी पार पडले. यावेळी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारनाम्यांवर स्वाक्षर्‍यादेखील करण्यात आल्या.