अलिबाग | सुधागड तालुक्यातील हातोंड बौद्धवाडी आणि गोंदाव या दोन गावांतील दरोड्याचा तपास करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. यामध्ये सहा दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार फरार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली.
अजय चव्हाण, आकाश चव्हाण, सुनील चव्हाण, मल्हारी चव्हाण, सोमनाथ चव्हाण आणि सुजल चव्हाण अशी अटक दरोडेखोरांची नावे आहेत. २६ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सुधागड तालुक्यातील हातोंड बौद्धवाडी आणि गोंदाव या गावांमध्ये ६ ते ७ जणांच्या टोळक्याने सशस्त्र दरोडा टाकला होता. यात सहा ते सात घरांना लक्ष्य करून घरातील व्यक्तींना शस्त्रांचा धाक दाखवून घरातील दागिने, पैसे आदी वस्तू लुटून नेल्या होत्या.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलिसांची दहा पथके तयार केली आणि तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली. या पथकांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून सर्व सहा आरोपींना एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असून आणखी अशाच प्रकारचे दोन गुन्हे केल्याचे मान्य केले आहे.
गुन्ह्यातील मुद्देमाल कुठल्या ठिकाणी विकला, याची माहिती मिळाली असून तो परत मिळवण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली. अटकेतील अजय चव्हाण याच्यावर रायगडसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात तब्बल ६ गुन्हे दाखल आहेत. आकाश चव्हाण याच्याविरोधात तीन तर सुनील चव्हाण याच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत. ठाणे गामीण पोलीस कार्यक्षेत्रात मुरबाड आणि टकवडे पोलीस ठाण्याच्या हददीतील गुन्हे उघड झाले आहेत.
रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र दौंडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, मानसिंग पाटील, उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेरेकर, उपनिरीक्षक शिंदे, उपनिरीक्षक निकम, उपनिरीक्षक गोसावी आणि कर्मचार्यांनी या तपासात भाग घेतला.
भाजी विकण्याच्या बहाण्याने केली जायची रेकी!
या घटनेतील गुन्हा करण्याची पद्धत समोर आली. यातील एक दरोडेखोर टेंपोमधून खेडेगावात भाजी विकण्याचा व्यवसाय करतो. हा भाजीचा व्यवसाय करीत असताना गावातील घरांमध्ये कुणी वयस्क व्यक्ती आहे का, महिलांच्या अंगावर कुठले दागिने आहेत, याची रेकी करत असे. त्यानंतर कुठल्या घरावर दरोडा टाकायचा? याचे नियोजन करून गुन्हा केला जात असे.