पोलादपूर | साखर दरडग्रस्तांची घरासाठी वणवण , सरकारच्या उदासीनतेमुळे स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थ उपोषणाला बसणार

By Raigad Times    13-Aug-2025
Total Views |
 poladputr
 
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
 
दुर्घटनेनंतर भेट देण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री, रायगडचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दरडग्रस्तांचे पुनर्वसन लवकरात लवकर राज्य शासनामार्फत केले जाईलअसे आश्वासित केले. आपत्तीग्रस्त कुटुंबियांना तात्पुरत्या निवारासाठी कंटेनर केबिनची व्यवस्था करण्यात आली. मात्र या घटनेला चार वर्षे उलटूनही साखर सुतारवाडी येथील दरडग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहेत.
 
साखर सुतारवाडी येथील पुनर्वसित घरांचे काम अद्याप रखडलेले आहे. घरांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी केवळ दोन लाख तीस हजार रुपयांचा निधी राज्य सरकार मार्फत उपलब्ध होत असून या निधीत घरांचे काम कदापी शक्य नसल्याने येथील ग्रामस्थांनी यास नकारात्मकता दर्शवली आहे. यातच २२ जुलै २०२१ रोजी महाड तालुक्यातील तळीये येथे झालेल्या दरड दुर्घटनेतील पीडितांना मागील वर्षभरापासून घरे मिळण्याचे सत्र सुरू आहे. या घरांसाठी शासनाने मुबलक निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे.