अलिबाग | शिवसेना ठाकरे गटातर्फे विविध स्थानिक प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी (११ ऑगस्ट) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारातून आत घुसण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. जवळपास तास दीड तास पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धुमश्चक्री सुरू राहिली.
हा मोर्चा शिवसेना उपनेते बबन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, प्रसाद भोईर, दिपश्री पोटफोडे, शिरीष घरत यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाच्या मार्गावरून जाणार्या रस्त्यावर खड्डे व चिखल साचल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मालकीच्या डान्स बारमधील बेकायदेशीर कृत्यांमुळे त्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावे,
सार्वजनिक बांधकाम खात्यातील मागील सोळा वर्षांतील विशेष ऑडिट करून चौकशी करावी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील पवित्रतेचा भंग आणि त्यांच्या जागी क्रीडामंत्री बनवण्याचा प्रयत्न रोखावा, नाशिक येथील हनीट्रॅप प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई करावी, वोट चोरी प्रकरणातील आरोपींवर निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशी करून कारवाई करावी, राज्यातील लाडक्या बहिणींना मंजूर अनुदानातील.
गैरव्यवहारात सामील अधिकार्यांवर प्रथम गुन्हे दाखल करावे, अशा मागण्या शिवसैनिकांनी यावेळी केल्या. मोर्चात सहभागी शिवसैनिकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत स्थानिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर पोलिसांनी बॅरिकेट्स उभारून मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांचे कडे तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.
शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीने निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी मोर्चाच्या पदाधिकार्यांचे निवेदन स्वीकारले. समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.