कर्जत | कर्जत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाकडून टोकाला जाणारी टीका होत आहे. त्यात रायगडचा वाल्मिक कराड, देशाचे स्वातंत्र्य, पैशांची देवाणघेवाण आदी सर्व बाहेर येत आहे. तर आमदार थोरवे यांनी ‘तुमच्या नेत्यांचा राजीनामा द्या, इकडे मी राजीनामा देतो’ असे खुले आव्हान जाहीररित्या दिले आहे. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या राजकारणात जोरदार चिखलफेक सुरू आहे.
महाड येथे जाहीर सभेत रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुनील तटकरे यांच्यावर आरोपांची राळ उठवली होती. त्यांनंतर रायगडच्या राजकारणात त्यावर भरपूर चर्चा झाली आणि त्यानंतर अगदी तिसर्याच दिवशी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊन जाहीर टीका करण्यात आली. त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर आरोपांची तोफ डागताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते सुधाकर घारे यांनी थेट विाल्मक कराड याच्याशी त्यांची तुलना केली. थोरवे यांना आव्हान देणारी भाषा पत्रकार परिषदेत झाली.
त्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनीदेखील सुनील तटकरे, सुधाकर घारे, भरत भगत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोपांची राळ उठवली. सुधाकर घारे यांच्यावर आपले भरपूर उपकार आहेत. हे त्यांच्या वडिलांना विचारा; पण तुम्ही माझ्यावर आरोप करताना परिसीमा बाळगली नाही. पराभव झाल्यावर तो पचवायचा असतो. आम्हीदेखील पराभव पचवला असून पराभव का झाला? याचे आत्मचिंतन करा, अशी सूचना केली. यानंतर सुनील तटकरे यांच्याकडे मोर्चा वळविताना ‘आमची मदत घेऊन सुनील तटकरे तुम्ही खासदार झाला आहात.
तुम्हाला तुमच्या राजकीय ताकदीची एवढी खात्री आहे तर राजीनामा द्या, मी देखील लगेच राजीनामा देतो. तुम्ही पुन्हा खासदार होऊन दाखवा’ असे आव्हान देताना ‘मला माझ्या शिवसैनिकांवर विश्वास असल्याने कर्जतमधून पुन्हा निवडून येईन, असा हल्ला चढवला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत भगत यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढविताना आमदार थोरवे यांनी, ‘याला वाटते त्याच्यामुळे देश स्वतंत्र झाला’ अशी टीका असताना ‘तू आधी माझ्याकडून घेतलेले पैसे परत दे नंतर बघू’ असे आव्हान दिले. ‘मी फार वाईट असून मला तोंड उघडायला लावू नका’ असे आव्हान आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केले आहे.
तर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढते त्यावेळी विरोधकांचा फायदा होतो, पण यावेळी महायुतीच्या घटक पक्षात अपक्ष बरोबर लढाई होती.या निवडणुकीत शिवसेना एकसंघ असती तर मला दीड लाख मते मिळाली असती आणि त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार, असे जाहीर केले. हे आरोप प्रत्यारोपाचे राजकारण आणि चिखलफेक सुरु असताना लागलीच ७ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस भरत भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार टीका केली.
भगत यांनीदेखील नेहमीप्रमाणे महेंद्र थोरवे यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढवला. ‘तुझे मी पैसे कधीच घेतले नाहीत तर मी अडचणीत असताना माझ्या मुलाकडून अकरा लाख उकळले’ असा आरोप त्यांनी केला. ‘तुमचे पैसे मी घेतले असतील तर कर्जत टिळक चौकात स्टेज बांधा. मी सर्व बँक डिटेल्स घेऊन येता. तेथेच जनतेच्या समोर कोणी कोणाचे पैसे घेतले? हे जाहीर करु’ असे आव्हान भरत भगत यांनी आमदारांना दिले. त्याचवेळी ‘आपण स्वातंत्र्य सैनिक यांचे सुपूत्र असून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठी भूमिका घेतली होती याचा आपल्याला अभिमान आहे.
माझ्या वडिलांनी भूमिहीन शेतकर्यांना जमिनी मिळवून देण्यासाठी लढा उभारला तर तुम्ही शेतकर्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचे काम करीत आहात. देश स्वतंत्र झाला, त्यावेळी माझा जन्म पण नव्हता आणि त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात माझा तसा काही संबंध नाही’ असे सांगताना आता हे दोन्ही शिवसेना एकसंघ करणार म्हणत आहेत, ते त्यांचे नेत्यांना पचणार आहे काय? असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे. जे जाणार होते ते तुमच्याबरोबर गेले आहेत राहिले आहेत. ते ठामपणे शिवसेना ठाकरे पक्ष ताकद बाळगून आहेत आणि त्यामुळे शिवसेना एकसंघ ठेवण्याचे विसरुन जा असा सल्ला भगत यांनी दिला. दरम्यान, या राजकीय चिखलफेकीमुळे कर्जत तालुक्याचे राजकारण खालच्या थराला गेले आहे.