महाड | छत्रपती शिवाजी महाराजांनी, परकीय आक्रमणांपासून देशाला मोकळे केले. त्यांचा राज्याभिषेक दिन हा देशात राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवा, अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. केंद्रीय शिक्षण संस्थांसह शालेय अभ्यासक्रमात संपूर्ण शिवचरित्राचा समावेश असला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुर्गराज रायगड तसेच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्यावतीने किल्ले रायगडवर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहोळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी संभाजीराजे छत्रपती, बोलत होते. संयोगिताराजे भोसले, शहाजीराजे भोसले, आ. मंगेश चव्हाण, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळेस प्रथमच युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी, इतिहासाचा अभ्यासक्रम, रायगड संवर्धन, गडकोट संवर्धन, अशा विविध विषयांवर परखडपणे आपली मते व्यक्त तर केलीच, त्याचबरोबर चित्रपट, नाटक, भाषणात सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याच्या प्रवृत्तींवरही सडेतोड भाष्य केले. शालेय शिक्षणात शिवचरित्र अत्यंत थोडं शिकविले जाते. केंद्रिय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात शिवचरित्राला फारसे स्थान दिले जात नाही.
जर आपल्याला पुढच्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार रुजवायचा असेल, तर शिक्षणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संपूर्ण शिवचरित्र शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाले पाहिजे. त्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकृत स्मारक ग्रंथ तयार करुन, त्याचा समावेश अभ्यासक्रमात करावा, अशी महत्वपूर्ण मागणी केली.