मुंबई | इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६ अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी २६ मे ते ३ जून २०२५ हा कालावधी देण्यात आला होता. ६ मे च्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
त्यानुसार इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदलाबाबत शासनाने ३१ मे रोजीच्या पत्रान्वये आदेश दिले असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.
पालक, विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा यास्तव विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक ३ जून ऐवजी सुधारित मुदतवाढीसह आता ५ जून २०२५ रोजी दुपारी २ पर्यंत करण्यात येत आहे. इयत्ता अकरावी प्रवेशा करीता इच्छुक विद्यार्थी, पालक यांनी विद्यार्थी नोंदणी या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणे राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.