दिघी | रायगड एसटी महामंडळाकडून श्रीवर्धन तालुयासाठी रोहा डेपोची गाडी देण्यात आली आहे. मात्र, या नादुरुस्त एसटीमुळे अपघात अपघात होता होता वाचला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांची मोठी दुर्घटना टळली आहे. श्रीवर्धन डेपोसाठी रोहा येथून आलेली एमएम १३ सीयू६८९६ या क्रमांकाची एसटी शनिवारी (२८ जून) सकाळी सहा वाजता प्रवाशांना घेऊन मुंबईहून श्रीवर्धनकडे सुटली.
मात्र, या प्रवासात गाडीच्या मागच्या बाजूस दोन चाकांना जोडणार्या एसेलचे एका बाजूचे नटबोल्ड पडले. एसेल पार्टवर असणार्या आठ नटबोल्डपैकी फक्त तीनच नट होते. तेसुद्धा निघण्याच्या अवस्थेत असताना खिळखिळ आवाज करत गाडी बोर्लीपंचतन पोहचली. गाडीतून येणार्या आवाजामुळे बोर्ली बसस्थानक परिसरात धवल तवसाळकर, सागर इंगळे, विजय कांबळे आदी ग्रामस्थांनी एसटी जागेवरच थांबवली. चालक व बसस्थानक व्यवस्थापक प्रसाद मोरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.
या गाडीने पुढे नानवलीकडे जाणारा घाट रस्त्यातून प्रवास धोकादायक ठरला असता. तात्काळ प्रवाशांना उतरवून दुसर्या गाडीची सोय केल्याने पुढील अनर्थ टळला. श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांचे ग्रहण लागले आहे. खराब बसेस प्रवासात बंद पडण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे.
रोहा आगारातील एसटी श्रीवर्धनकडे आल्या आहेत. प्रवासासाठी सर्व वाहनांची तपासणी करून सोडण्यात येतील. - महेबुब मनेर, आगार प्रमुख, श्रीवर्धन