सोगाव | अलिबाग रेवस मार्गावर रेवस बायपास ते विद्यानगर दरम्यान भररस्त्यात मोकाट गुरांनी ठिय्या मांडला आहे, यामुळे या मार्गावर प्रवास करताना दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. तसेच हि गुरे भररस्त्यात ठिय्या मांडून बसत असल्यामुळे अपघात घडत असल्याने दुचाकीवरून प्रवास करणार्या दुचाकी स्वारांच्या अपघातात देखील लक्षणीय वाढ झाली आहे.
अलिबाग शहर हे रायगड जिल्ह्याची राजधानी असल्याने या शहरामध्ये विविध शासकीय, निमशासकीय, जिल्हा न्यायालय, पोलीस स्टेशन, पोलीस मुख्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा परिषद, तहसीलदार कार्यालय व विविध प्रकारची अनेक कार्यालये तसेच विविध प्रकारच्या शासकीय व खाजगी रुग्णालयात जिल्हाभरातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने येणार्या नागरिकांना व वाहनचालकांना मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडी होऊन नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिवाय वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांचे प्रसंगी गुरांचे देखील अपघातामुळे मार लागून दुखापत होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन गुरांना निष्काळजीपणे रस्त्यावर मोकाट सोडणार्या गुरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.