महाड | उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, महाड यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रातील सर्व पुलांची अलिकडेच पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान वाळणकोंड, ता. महाड येथील वरदायनी माता मंदिर परिसरातील केबल स्टे ब्रिज अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुमारे १९९० च्या दशकात बांधलेला हा पूल सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून, ब्रिजवरील सर्व केबल्स खराब आणि निकामी झालेल्या आहेत, त्यामुळे या पुलावरून पादचारी वाहतुकीचा कोणताही प्रकार अत्यंत धोकादायक ठरू शकतो. जिल्हा परिषदेच्यावतीने सन २०२३ मध्ये एकदा दुरुस्ती केली गेली होती, परंतु त्यानंतरही पूल पूर्णपणे सुरक्षित झालेला नसून, कोणतीही अनुचित घटना घडण्याचा धोका कायम आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खालील तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक, पादचारी चालन तत्काळ बंद करण्यात यावी. जिल्हा परिषद रायगड यांना याबाबत तातडीने सूचना पाठवण्यात याव्यात. सदर ठिकाणी २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, जेणेकरून नागरिक पुलावर प्रवेश करणार नाहीत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून सदर पुलावरून जाणे टाळावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.