मनसेचा दणका! जे.एम.बक्षी पोर्ट नमले , नोकरभरतीबाबत इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली जाहिरात रद्द

By Raigad Times    28-Jun-2025
Total Views |
 uran
 
उरण | मनसेच्या दणक्यानंतर उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टमधील न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल (एनएसएफटी) जे.एम.बक्षी अँड सीएमए टर्मिनल्स पोर्टने नमते घेत, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली नोकरभरतीची जाहिरात रद्द केली आहे. यापुढे स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन नोकरभरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे.
 
त्यामुळे हा विजय हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांचा विजय आहे, अशी प्रतिक्रीया मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केली. जे.एम.बक्षी अँड सीएमए टर्मिनल्स पोर्टने दहा दिवसांपूर्वी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये मुलाखती ह्या गुजरात राज्यातील मुद्रा या ठिकाणी होणार असल्याचे व कामाचा पत्ता हा जेएनपीटी उरण नवी मुंबई हा असल्याचे प्रसिद्ध केले होते.
 
uran
 
एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्रामध्ये आणि नोकरभरतीच्या मुलाखती या गुजरात राज्यात...या मनमानीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुका अध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत यांनी आवाज उठविण्याचा निर्णय घेतला. या नोकरभरती प्रक्रियेची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेऊन प्रसारमाध्यमांतून हे प्रकरण समोर आणले.
 
याची दखल घेत, जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी शुक्रवारी (२७ जून) बंदर प्रशासनाच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत मनसेचे नेते अविनाश जाधव, सरचिटणीस संजय नाईक, सरचिटणीस संदीप दळवी यांनी मराठी माणसावर पोर्ट टर्मिनल कशाप्रकारे अन्याय करत आहे? ही बाब उन्मेष वाघ यांच्या निदर्शनास आणून दिली.

uran
 
नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देणार; जेएनपीए बंदराचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांचे आश्वासन
यावेळी जे एम बक्षी अँड सीएमए टर्मिनल्स पोर्टने इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली नोकरभरतीची जाहिरात रद्द करून यापुढे स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि नोकरभरतीत स्थानिक भूमिपुत्र व मराठी तरुणांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
 
त्यामुळे मनसेने त्यांचे आभार व्यक्त केले. या बैठकीला जे एम बक्षी अँड सीएमए टर्मिनल्स पोर्टचे व्यवस्थापन अधिकारी अनिरुद्ध लेले, बीएमसीटी पोर्टचे व्यावसायिक अधिकारी मनोज गावंड, जेएनपीए बंदराच्या अधिकारी मनिषा जाधव, जेएनपीए बंदराचे ट्रस्टी दिनेश पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड.सत्यवान भगत, महिला जिल्हाध्यक्षा आदिती सोनार, प्रविण दळवी, मनसे प्रवक्ते योगेश चिले, उपजिल्हा अध्यक्ष दिपक कांबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल आणि न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, कविता म्हात्रे महिला तालुकाध्यक्ष, उरण शहर महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, शेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे आदिंसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मनसेमुळे मराठी तरुणांना न्याय मिळणार असल्याने तमाम जनतेने मनसेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.