अलिबाग | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शेकापक्षाला सोबत घेऊन निवडणुका लढविण्याची संभावना मला अजिबात दिसत नाही. त्यांच्या नेत्यांशी माझा गेली काही वर्षे संवाद नाही आणि होईल असे वाटतदेखील नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीचे नेते खा.सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. खा. सुनील तटकरे हे गुरुवारी (२६ जून) अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ नेते हर्षल पाटील, अमित नाईक, महिला आघाडीच्या नेत्या उमा मुंढे, तालुकाध्यक्ष जयेंद्र भगत आदी उपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये वाद सुरु आहेत. एकमेकांविरोधात जोरदार वाक्?युध्द चालले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेली शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप ही महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र राहणार की तुटणार? वेळ पडल्यास राष्ट्रवादी काँगे्रस आणि शेकाप अशी युती होईल, अशी चर्चा सुरु आहे.
याबाबत पत्रकारांनी विचारले असता, खा.सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेकदा युती, महाआघाडीची सरकारे आली आहेत. १९९५ ला पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचे सरकार आले होते. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ते वेगवेगळे लढले. यानंतर लोकशाही आघाडीचे सरकार आले, त्यावेळी मला राजीनामा द्यावा लागला, तो इतिहास अलिबागकरांना माहिती आहे.
याची आठवण तटकरे यांनी करुन दिली. पुढे ते म्हणाले की, राज्यात सत्तेत एकत्र असलेले पक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतातच असे नाही; मात्र या वेळेला महायुतीला राज्यातल्या जनतेने अभुतपूर्व यश दिले आहे. त्यामुळे महायुतीतील हे सामंजस्य अधिक कसे टिकवता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. याबाबत आमची बैठकदेखील झाली. यामध्ये पुढील निवडणुका महायुतीमध्ये कशापध्दतीने लढवल्या पाहिजेत? महामंडळाच्या नियुक्त्या यावर चर्चा झाल्याचे तटकरे यांनी सांगितले.
पालकमंत्रीपद दिल्यास युतीचा विचार करु, असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले होते. पत्रकारांनी याबाबत छेडले असता, स्थानिक पातळीवर कुठल्या पक्षाचे नेतृत्व काय बोलताहेत? त्याबद्दल बोलणार नाही. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे, निवडणुका हा त्याचाच एक महत्त्वाचा गाभा असतो. निवडणुका येतील तेव्हा निर्णय घेऊ. आज काय त्याच्याबद्दल फार गांभीर्याने बोलावे, असे मला वाटत नाही, असेही तटकरे म्हणाले.
पहिलीपासून हिंदी सक्ती योग्य नाही
देशपातळीवर काम करताना अधिक बोलीभाषा अवगत होणे ही काळाची गरज आहे; मात्र तिची पहिलीपासून सक्ती करणे योग्य राहणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे. याबाबत योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नव्या पिढीला पुढच्या आव्हानांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे ते शिक्षण आणि भाषा त्यांना अवगत होणे आवशक आहे. मात्र याचा अर्थ असा नव्हे की मातृभाषेवर अन्याय होईल, असे अजिबात नाही. मातृभाषेचा प्रभाव, गोडवा, सामर्थ्य नवीन पिढीने टिकवले पाहिजे, वाढवले पाहिजे, संत वाङमयाचा अभ्यास केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. तटकरे यांनी दक्षिणकडचे नेते हिंदी ऐवजी इंग्रजीसाठी किती आग्रही असतात, याचे उदाहरणदेखील दिले.