अलिबाग | राज्य व केंद्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्व योजनांचा तत्परतेने लाभ देण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे असे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्रीमती बोर्डीकर यांनी गुरुवारी (२६ जून) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांचा आढावा घेतला. रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणी तसेच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या पाणी प्रश्न, जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विषयावर मंत्रालयात विशेष आढावा बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी जाहीर केले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती प्रक्रिया तातडीने करावी, आरोग्याच्या सुविधा आणि योजना १०० टक्के राबविल्या जातील याकडेही लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
वीज वितरणविषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे, अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी सर्वांनी नेहमी दक्ष रहावे, भूमिगत वायरिंगचे काम पूर्ण झाले असल्यास ओव्हरहेड वायरिंग हटविण्यात यावेत, अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वारंवार बदलावे लागतात, त्याची कारणमीमांसा करून उपाययोजना करावी, सेवा सप्ताह अंतर्गत जी धोकादायक क्षेत्रनिश्चित केली आहेत त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ. रविंद्र शेळके, माजी आमदार पंडित पाटील, अॅड. महेश मोहिते, वैकुंठ पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयाला अचानक भेट
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी गुरुवारी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील समस्यांची माहिती करुन घेतली. आवश्यक ती मदत सरकार आपल्याल करेल असे सांगतानाच रुग्णांवर योग्य उपचार केले जावेत. त्यांची गैरसोय होणार नाही यांची काळजी घेण्याची सुचना बोर्डीकर यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.