नवी मुंबई विमानतळाच्या कामाला वेग , १ सप्टेंबरपासून टर्मिनल-१ सुरु होणार

वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता; आंतरराज्यीय सेवेने होणार सुरुवात

By Raigad Times    25-Jun-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला वेग आला आहे. ‘इंटर टर्मिनल कनेक्टिव्हिटी’ असणारे भारतातील हे पहिलेच विमानतळ असणार आहे. वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असलेले टर्मिनल १ सप्टेंबर २०२५ पासून सुरु होईल. येथून आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
 
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (२४ जून) प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देऊन कामाचा संपूर्ण आढावा घेतला. अधिकार्‍यांना कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या. अदानी एअरपोर्ट विभागाच्या सीईओ मिनल नाईक, सिडको प्रोजक्ट मॅनेजर गीता पिल्ले यांनी विमानतळाच्या कामाचे सादरीकरण दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, जिल्हाप्रमुख अतुल भगत, उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे, शिवसेना पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुकाप्रमुख दिपक ठाकूर, शहरप्रमुख प्रसाद परब, तुकाराम सरख, सुनिल गोवारी, प्रसाद सोनवणे, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, संपर्कप्रमुख मंगेश राणवडे, महिला उरण विधानसभा जिल्हा संघटिका मेधा दमडे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
 
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पुणे आणि मुंबईला जोडणार्‍या पनवेलमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. मेट्रो १, मेट्रो २, मेट्रो ३ यासह वॉटर टॅक्सी, स्थानिक लोकल ट्रेन सेवा आणि भविष्यातील मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन यांची थेट कनेक्टिव्हिटी आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंतदेखील थेट कनेक्टिव्हिटी असणार आहे. प्रदूषणरहित ग्रीन एअरपोर्ट कन्सेप्ट राबविली जाणार आहे.
 
११५० हेक्टर इतक्या मोठ्या परिसरात एअरपोर्टचा विस्तार होत आहे. विमानात इंधन भरण्याची अंडरग्राऊंड पाईपलाईनतर्फे प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. १ सप्टेंबर २०२५ पासून टर्मिनल-वन सुरू होणार आहे. त्याची वार्षिक दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. २०२९ पर्यंत टर्मिनल-टू सह जवळजवळ ८० टक्के कामकाज पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे. २०३६ पर्यंत चार टर्मिनल्स, एक व्हीआयपी टर्मिनल, जनरल एव्हिएशन (खाजगी विमाने) देशातील सर्वात मोठे कार्गो डेपो असे संपूर्ण विमानतळ शंभर टक्के विकसित होणार आहे.
 
३.७ किलोमीटरचा सर्वाधिक लांबीचा रनवे असणार आहे. त्यावर मोठी कार्गो विमाने व एअरबस ए-३८० सारख्या विमानांचे लँडिंग आणि उड्डाण शक्य होणार आहे. मुंबईच्या सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळजवळ दुप्पट प्रवासी व विमानांच्या दळणवळणाची क्षमता आहे.
विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे. सप्टेंबर २०२५ रोजी आंतरराज्यीय विमानसेवा प्राथमिक स्तरावर चालू होईल. सर्व वाहतूक व्यवस्थेला विमान सेवा जोडल्या जाणार आहेत. यामध्ये मेट्रो, भूमिगत रेल्वे, बुलेट ट्रेन या सेवेचा समावेश आहे. २०२९ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमाने पूर्णपणे उड्डाणे घेतील. देशातील महत्वाचे व मोठे विमानतळ म्हणून याकडे पाहिले जाते. विमानतळासाठी केंद्र सरकार, सिडको यांच्या माध्यमातून लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. - श्रीरंग बारणे, खासदार, मावळ