सुधागड-पाली | मुसळधार पावसामुळे येथील बस स्थानक जवळील अंबा नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ओव्हळाच्या बाजूने खचला आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे या रस्त्याच्या कडेची माती वाहून गेली. त्यामुळे रस्त्याला आधार राहिला नाही आणि रस्ता ओव्हळाच्या बाजूने खचला आहे.
हा रस्ता खचल्यामुळे आता येथून प्रवास करणे धोकादायक व जिकरीचे झाले आहे. त्यामुळे नगरपंचायतने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी व ओव्हळाच्या बाजूने कठडा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे येथील ओहळाची माती वाहून गेली. त्यामुळे रस्ता खचला आहे. नगरपंचायत मार्फत लागलीच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल. -सुलतान बेनसेकर, बांधकाम सभापती, नगरपंचायत पाली