आजपासून समुद्राला उधाण; चार मीटर उंच लाटांचा इशारा

लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना , राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

By Raigad Times    24-Jun-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | कोकण किनारपट्टीला आजपासून २५ जून रोजी रात्री साडेआठ वाजेपर्यंत उंच लाटांचा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रातर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राज्यात पुढील २४ तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
 
राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (२३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात ७३.३ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३६.४, रत्नागिरी जिल्ह्यात २५.८ मिमी, ठाणे जिल्ह्यात १४.३ आणि कोल्हापूर जिल्ह्यात १३.९ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
 
ठाणे जिल्ह्यात पुरात वाहून एक व खड्यामध्ये बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुणे जिह्यात नदीत वाहून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.