धाटाव औद्योगिक वसाहतीत रस्त्याला लागले ग्रहण , पंधरा दिवस रखडलेले काम पूर्ण होणार कधी? कामगारांचा सवाल

By Raigad Times    24-Jun-2025
Total Views |
 roha
 
धाटाव | धाटाव एमआयडीसीतील निलिकॉन व एफडीसी कंपनीच्या कॉर्नरवर गटाराच्या कामासाठी एक भला मोठा खड्डा खोदलेला होता. तेथे ठेकेदाराने चक्क मातीचा ढिगारा रचून ठेवलेला असल्याने पावसामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल साचला आहे. या रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसापासून रखडलेले आहे. त्यामुळे कामगारांसह केमिकल टँकर वाहनचालकांना ये-जा करण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
पावसाचे दिवस सुरु असून, या खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने रात्रीच्या वेळी एखाद्या वाहनाला अंदाज आला नाही तर एखादा अपघात होण्याची शयता आहे. त्यामुळे आता रखडलेला रस्त्याचे ग्रहण सुटणार कधी? अपूर्ण काम पूर्ण होणार कधी? असा सवाल कामगारवर्गातून उपस्थित केला जात. हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असून अनेक गावांना जोडणारा रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूलाच निलिकॉन, एफडीसी, मजदा, रोहा डाय असे अनेक कारखाने असून पलीकडे किल्ला धाटाव, बारसोली हे गाव देखील त्या ठिकाणी असलेले आहे.
 
तर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला अंशुल, युनिकेम, एसेल, एंथिया, सॉल्वे हे कारखाने आहेत. रोड बुद्रुक, मलखंडवाडी, तळाघर, महादेव वाडी यांच्या दृष्टीने हा रस्ता जोड रस्ता आहे. रोजचा रोज हजारो संख्येने नागरिक, कामगार, शाळकरी विद्यार्थी, ट्रान्सपोर्टच्या गाड्या ये-जा करीत असतात. दरम्यान, एक महिन्यापासून एमआयडीसीत अनेक ठिकाणी खोदकामे सुरू आहेत. हे खोदकाम करण्यासाठी आणलेली मशिनरी पूर्णतः कार्यरत नव्हती. मागील पंधरा दिवसापासून ही मशिनरी बंद अवस्थेत होती.
 
त्यानंतर एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना पत्रकारांनी जाब विचारल्यानंतर तेथे काम पूर्ण सुरु करण्यात आले. मात्र दोन ते तीन दिवसानंतर ती मशिनरी हटवून पुन्हा रस्त्याचे काम थांबविण्यात आले. आता याठिकाणी कोणत्याही पद्धतीचे काम सुरू नाही. पाऊस जोरात सुरू आहे. नाले तुडुंब वाहत आहेत. रस्त्यावर पाणी व चिखलाचे साम्राज्य त्या ठिकाणी दिसत आहे. वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशी दुर्दशा अजून किती दिवस पहावी लागणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.