उरण | नोकरभरती उरणला...त्याच्या जाहिराती इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आणि मुलाखती गुजरात राज्यात घेतल्या जाणार आहेत. जेएनपीटी पोर्टमधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल कंपनीच्या या खोडसाळ हरकतीमुळे उरणमधील तरुण संताप व्यक्त करत आहेत. या नोकर्या नेमक्या कोणाच्या घशात घालायच्या आहेत? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख संदेश ठाकूर यांनी केला आहे.
जेएनपीए बंदर उभारण्यासाठी उरण तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या शेतजमिनी दिल्या, त्यावेळी स्थानिकांना रोजगार देण्याचे अभिवचन दिले. मात्र जमिनी मिळाल्यानंतर भूमिपुत्राला सापत्नपणाची वागणूक बंदर प्रशासन देत आहे. नागरी सुविधांबरोबर रोजगारापासून वंचित ठेवण्याचे काम बंदर प्रशासन करीत असल्याची तरुणांची भावना आहे. जेएनपीटी पोर्टमधील न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनल या कंपनीची हरकत, महाराष्ट्राचा अपमान करणारी असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
जे.एम. बक्षी, सीएमए टर्मिनल्स या पोर्टने नोकरभरतीची जाहिरात केवळ इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली होती. या भरतीच्या मुलाखती (इंटरव्यू) थेट महाराष्ट्राबाहेर गुजरात राज्यातील मुद्रा येथे ठेवल्या आहेत. कामाचा पत्ता हा उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केला आहे. जेएनपीए बंदर प्रशासनाने स्थानिक वृत्तपत्रात नोकरभरतीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध न करता इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन गुजरात राज्यात नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे.
एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करायचा आणि मराठी माणसाच्या, स्थानिक भूमिपुत्राच्या जखमेवर मीठ चोळून नोकरभरती प्रक्रिया गुजरातला करायची, हे योग्य नाही. सदर भरतीप्रक्रिया थांबवली नाही तर येत्या दहा दिवसांमध्ये संबंधित पोर्टचे कामकाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद करेल, अशा प्रकारचे लेखी निवेदन जेएनपीए बंदराचे चेअरमन उमेश वाघ, एनएसएफटीचे सीईओ अनिरुद्ध लेले यांना देण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त मा. डॉ. विशाल नेहूल आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बापू तुळशीराम ओवे यांनादेखील याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, बंदर प्रशासनाने यापुढे स्थानिक मराठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि उरण परिसरातील तरुणांना नोकरीत समाविष्ट करावे, अन्यथा मुजोर बंदर प्रशासनाविरोधात मनसे तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर यांनी दिला आहे.
दरम्यान, निवेदन देतेवेळी उरण तालुका अध्यक्ष अॅड.सत्यवान भगत, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, कविता म्हात्रे महिला तालुकाध्यक्ष, उरण शहर महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, शेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे उपस्थित होते.