अलिबाग | उमाजी म. केळुसकर| राजकारण आणि अंधश्रद्धा यांचं नातं आपल्या देशात काही नवीन नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी अनेक नेते वेगवेगळ्या युक्त्या वापरतात, ज्यात कधीकधी अघोरी मार्गांचाही अवलंब केला जातो. अलीकडेच शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री भरत गोगावले यांच्या संदर्भात समोर आलेल्या ‘अघोरी मांत्रिका’च्या घटनेमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप असणार्यांना आपल्या ‘सत्तेच्या मंत्रा’ने ‘पवित्र’ करुन घेण्याची कला भाजपने प्राप्त केली आहे. याची अनेक उदाहरणे पहायला मिळतील; पण येथे प्रश्न आहे खर्याखुर्या अंधश्रद्धेचा. सत्ताधारी अशा अघोरी मार्गांचा वापर करत असतील, तर हे निश्चितच चिंताजनक आहे; पण लगबग बहुतांशी नेते अंधश्रद्धांना खतपाणी घालताना दिसतात. राजकीय वर्तुळात अशा अघोरी पूजा, मंत्र-तंत्र किंवा जादूटोणा करण्याचे प्रकार वारंवार समोर येतात.
सत्ताधारी असो वा विरोधक, दोन्ही बाजूंचे नेते गुप्तपणे किंवा उघडपणे अशा मार्गांचा अवलंब करतात. आपली खुर्ची टिकवण्यासाठी, विरोधकांना कमजोर करण्यासाठी किंवा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी हे सगळे प्रयत्न केले जातात. त्यांचा असा विश्वास असतो की, अशा अघोरी शक्तींच्या आशीर्वादाने त्यांना राजकीय फायदा मिळतो, त्यांचे विरोधक नामशेष होतात आणि त्यांची सत्ता अधिक मजबूत होते. यातून त्यांना किती फायदा होतो? हा अर्थातच वादाचा आणि संशोधनाचा विषय आहे. कारण अनेकदा अशा पूजा-विधींनंतरही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
पण तरीही, मनातील भीती, असुरक्षितता आणि विजयाची तीव्र इच्छा यातून नेते अशा गोष्टींकडे आकर्षित होतात. या तंत्रमंत्रामागे अनेकदा केवळ वैयक्तिक श्रद्धा किंवा भीती नसते, तर त्यामागे सत्तेच्या आणि वर्चस्वाच्या राजकारणाची मोठी भूमिका असते. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात रायगड जिल्ह्यावरील वर्चस्वासाठी पेटलेली ठिणगी आणि भरत गोगावले यांच्यासमोरील पालकमंत्रीपदाचे आमिष हे या अघोरी प्रयोगांमागील एक महत्त्वाचे कारण मानले जाते. पालकमंत्रीपद हे जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासनावर पकड ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
जिल्ह्यावर आपला वरचष्मा राखण्यासाठी आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना शह देण्यासाठी अशा अघोरी साधनांचा आधार घेतला जात असावा, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. समाजात अनेकदा ‘सापडला तो दोषी’ अशी एक अलिखित प्रथा दिसून येते. ज्याचे अघोरी विधी किंवा जादूटोण्याचे प्रकार उघड होतात, त्यालाच टिकेचा सामना करावा लागतो. पण पडद्यामागे असे अनेक नेते असू शकतात, जे वरकरणी पुरोगामित्वाची किंवा विवेकाची भाषा बोलतात, पण प्रत्यक्षात गुप्तपणे अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालत असतात.
राजकारणात अशा बुवा-बाबांच्या आणि अघोरी मांत्रिकांच्या नादी लागण्याचे प्रकार नवीन नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षांपूर्वी एका तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी लिंबू आणि टाचण्या सापडल्याची घटना खूप गाजली होती. विरोधकांनी याला मुख्यमंत्र्यांनी केलेला जादूटोणा किंवा अघोरी प्रयोगाचा भाग असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या सत्तेच्या काळातही अनेक नेते अशा बुवा-बाबांच्या, तांत्रिकांच्या मागे लागले होते. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरदेखील अशाप्रकारचे आरोप झाले होते.
माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव हेदेखील विवादास्पद स्वयंभू संत चंद्रस्वामी यांचे अनुयायी मानले जात होते. चंद्रस्वामी यांची राव यांच्याशी असलेली जवळीक खूप गाजली होती. चंद्रस्वामींवर अनेक गुन्हेगारी आरोपही होते, तरीही ते राव यांच्या कार्यकाळात खूप प्रभावशाली होते, असे म्हटले जाते. राव पंतप्रधानपदी येण्यामागे चंद्रस्वामींच्या तंत्रमंत्राचा हात होता, अशीही चर्चा त्यावेळी होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी एकदा आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केला होता, असे बोलले जाते.
हा बदल एका ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार केल्याची चर्चा होती. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे ज्योतिष आणि धार्मिक विधींवर खूप विश्वास ठेवतात, असे म्हटले जाते. अलिकडेच, त्यांनी आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरुद्ध ‘शत्रू भैरवी याग’सारखे काळे जादुई विधी केल्याचा आरोप केला होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी (काँग्रेसचे मित्रपक्ष) यांनीही अनेकदा तांत्रिक विधी केल्याचे समोर आले आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यादेखील ज्योतिष आणि धार्मिक विधींवर खूप विश्वास ठेवत असत.
निवडणुका जवळ आल्या की, अनेक नेते मोठ्या प्रमाणात होम-हवन, यज्ञ आणि नवस करताना दिसतात. काही नेते विशिष्ट मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा करतात, तर काहीजण खासगीत तांत्रिकांकडून विधी करवून घेतात.आंध्र प्रदेशमधील माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव आणि नंतरच्या काळात चंद्रबाबू नायडू किंवा जगमोहन रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांनीही ज्योतिष आणि तांत्रिकांवर मोठा विश्वास ठेवल्याचे बोलले जाते.
काही राजकारणी तर बुवा-बाबांशी उघडपणे संबंध ठेवतात. ते त्यांच्या आश्रमांना भेटी देतात, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना व्यासपीठावर स्थान देतात आणि त्यांचे आशीर्वाद घेताना दिसतात. मध्यप्रदेशातील काही नेते मिर्ची बाबांसारख्या बुवांच्या आश्रयाला गेल्याचेही समोर आले आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी देवीलाल यांच्यावरही एका बुवाचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले जाते. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी असो किंवा एखादा महत्त्वाचा राजकीय निर्णय, अनेक नेते ज्योतिषी किंवा पंचांग पाहून शुभ-अशुभ मुहूर्त काढताना दिसतात.
काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी किंवा अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते, आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी किंवा त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काळ्या जादूचा किंवा अघोरी विधींचा वापर करत असल्याचीही चर्चा अनेकदा ऐकायला मिळते. अर्थात, हे प्रकार सहसा समोर येत नाहीत, कारण ते कायदेशीररित्या गुन्हा ठरतात आणि त्याची ठोस माहिती मिळणे कठीण असते. प्रश्न असा आहे की, एकविसाव्या शतकात, जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे, तेव्हाही आपले राजकारणी अशा अंधश्रद्धांना का बळी पडत आहेत? यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण म्हणजे असुरक्षितता.
राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. सत्ता कधी येईल आणि कधी जाईल, याचा भरवसा नसतो. अशा स्थितीत, काहीतरी दैवी शक्ती आपल्याला वाचवेल किंवा मदत करेल, अशी आशा नेत्यांना वाटते. दुसरे कारण म्हणजे ‘अज्ञानाचे राजकारण’. जेव्हा नेते स्वतःच अशा गोष्टींवर विश्वास ठेवू लागतात, तेव्हा ते समाजालाही चुकीचा संदेश देतात. त्यांच्या या कृतींमुळे समाजात अंधश्रद्धांना अधिक बळ मिळते. तिसरे कारण म्हणजे विजयाची लालसा.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्याची आणि सत्ता मिळवण्याची तीव्र इच्छा नेत्यांना अशा मार्गांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करते. लोकशाहीमध्ये जनतेची निवड हीच खरी शक्ती आहे. राजकारण हे लोकांच्या हितासाठी आणि विकासासाठी असावे. भीती, अंधश्रद्धा किंवा अज्ञान याला कुठेही स्थान असता कामा नये. त्यामुळे बुवाबाजीच्या अधीन होणारे गोगावले असोत किंवा राजकीय इप्सित साधण्यासाठी त्यांना अर्धनग्न करणारे विरोधी आणि माध्यमं, दोघेही सारखेच. सत्तेसाठी, वर्चस्वासाठी कुठल्या थराला हे लोक जाऊ शकतात, याचे गोगावले प्रकरण म्हणजे एक उदाहरण आहे. सत्तेसाठी लोकशाहीच्या मंदिरातील हे अघोरी प्रयोग थांबले पाहिजेत; अन्यथा, हे केवळ राजकारणाला नव्हे, तर समाजालाही अधोगतीकडे नेईल.