अलिबाग | खरीप हंगामात शेतकर्यांची कुठलीही गैरसोय किंवा फसवणूक होवू नये, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. बियांण्यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. रायगड जिल्ह्यात भातबियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
जिल्ह्यात जवळपास ७ हजार क्विंटल भातबियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात यंदा ८१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकर्यांच्या गरजेनुसार त्यांना पुरेसे भातबियाणे उपलबध होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने बियाण्यांची मागणी नोंदवली होती. आता हे बियाणे आता सर्व कृषी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी
प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. बियाणे खरेदी करताना टॅगवर पिकाचे, जातीचे नाव, बियाण्याच्या प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, उगवण क्षमता, शुद्धतेचे प्रमाण, वजन विक्रीची किंमत तपासून पहावी. यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, चाचणीची तारीख आदि बाबी काळजीपूर्वक वाचाव्यात. सर्व माहिती वाचून खात्री झाल्यानंतरच अधिकृत विक्रेत्याकडूनच शेतकरयांनी बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती अवश्य घ्यावी. मुदतबाह्य किंवा पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करून नये.
बियाण्याची उपलब्धता
महाबीज - २०५७ क्विंटल, खाजगी-४४३९ क्विंटल, विद्यापीठ-४०५ क्विंटल, एकूण-६९०१ क्विंटल
बियाण्याचे प्रकार
महाबीज जया, कर्जत ३, सुवर्णा, कर्जत ७, एमटीयु १०१०, खाजगी कोमल १०१, सुवर्णा, श्री १०१, सारथी, अस्मिता, अजिता, अक्षत, रूचिका, गंगोत्री, जया, देवकी,अवनी, केपी २६४, जोरदार १६०, संपदा, विराट जेट, रत्नागिरी ८, कर्जत ७.
शेतकर्यांची फसवणूक करू नये अशा सक्त
सुचना सर्व कृषी केंद्रांना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हयातील सर्व कृषी केंद्रांवर कृषी विभागातर्फे भाताचे वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकरयांनी अधिकृत कृषी केंद्रांवरून खात्री करूनच बियाणे खरेदी करावे. - वंदना शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.