२० लाखांच्या नादात, ५० लाख गमावले! आठ भामट्यांच्या टोळीकडून तळोजातील तरुणाला गंडा

By Raigad Times    19-Jun-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | ५० लाख रोख दिल्यास त्याबदल्यात आरटीजीएसद्वारे ७० लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून एका टोळीने तळोजा येथील ३२ वर्षीय तरुणाला गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २० लाखांचा नफा कमावण्याच्या नादात या तरुणाने ५० लाख गमावले. मुंबईतील विद्याविहार भागात बोलावून या तरुणाकडील ५० लाखांची रोकड घेऊन या भामट्यांनी पलायन केले.
 
याप्रकरणी ८ जणांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. अशरफ खान हा तळोजा फेज-१ मध्ये राहतो. त्याचे मित्र डॅनी, गोपाळ व रेहान यांनी एक व्यक्ती ५० लाख रुपये रोख दिल्यास त्याबदल्यात ७० लाख रुपये आरटीजीएसद्वारे देतो, असे त्याला सांगितले. या व्यवहारात अल्पावधीत २० लाख रुपये मिळतील, या आमिषाने अशरफ खान याने भावाकडून ५० लाखांची रोख रक्कम घेतली.
 
त्यानंतर व्यवहारासाठी इमान, प्रशांत आणि उज्ज्वल शहा व अन्य एक यांच्या टोळीने अशरफ खान यांच्याशी फोनवर संपर्क साधला. कॉन्फरन्स कॉलद्वारे अनेकवेळा त्याच्याशी बोलणे करत त्याला या व्यवहारासाठी तयार केले व त्यासाठी तयार होताच त्यांनी १४ जून रोजी ५० लाख रुपये घेऊन विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजजवळ यायला सांगितले. त्यानुसार अशरफ खान हा डेनी आणि आकाश या मित्रांसोबत ५० लाख रुपयांची रक्कम घेऊन येथे गेला.
 
याठिकाणी एका सफेद रंगाच्या कारमधून आलेल्या व्यक्तींनी पोलीस आल्याचे भासवून अशरफ खान याच्याजवळील रोख रक्कम घेऊन कारमधून पलायन केले. त्यानंतर या टोळीतील उज्ज्वल शहा याने अशरफ खान याला पैसे घेण्यासाठी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये भेटण्यास बोलावले. त्यानुसार अशरफ तेथे पोहोचला. मात्र, रात्री उशिरापर्यंत थांबल्यानंतरही तेथे अशरफला भेटायला कुणीच आले नाही.
 
या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर अशरफ याने प्रथम मुंबईतील टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, टिळकनगर पोलिसांनी उज्ज्वल शहा, डॅनी, गोपाळ, रेहान, मनोज, इमान, प्रशांत आणि एक अनोळखी व्यक्ती अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पुढील तपासासाठी तळोजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार, तळोजा पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.