मुंबई | भारतीय हवामान व विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७. मिमी पाऊस झाला आहे.
तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर १००.४ मिमी, मुंबई उपनगर ८६ मिमी, रायगड ७२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदी पात्रातील नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. तसेच एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.