मुरुड जंजिरा | करंजा-रेवस रेड्डी या समुद्री महामार्गावरील नियोजित पुलांचे बांधकाम सुरू झाल्याने याठिकाणी कोळी मच्छिमारांना उद्भवणार्या समस्या व त्यामुळे होणार्या आर्थिक नुकसानीमुळे कोळी बांधव हैराण झाले आहेत. यासंदर्भात अधिकारी व मच्छिमार प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावून तोडगा काढावा; अन्यथा हे काम बंद करावे, असे निवेदन रायगड जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.
यावेळी रायगड जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, उपाध्यक्ष मनोहर बैले, रायगड जिल्हा मच्छिमार शेलचे अध्यक्ष सिताराम नाखवा, चाणजे ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे, मुरुड, अलिबाग सोसायटीचे चेअरमन, करंजा, कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, देवयानी कोळी आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. रेवस रेड्डी समुद्री मार्ग हा एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे.
दोन ते तीन महिन्यांपासून रायगडमधील करंजारेवस, रेवदंडा-साळाव, दिघी राजपुरी इत्यादी खाड्यांमध्ये जिओलॉजीकल सर्व्हेचे काम व बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हा सर्व्हे प्रत्येक खाडीत दोन ते तीन महाकाय अशा जेकब बार्जेसव्दारे केला जात आहे. सर्व्हेचे काम खाडीत १०० ते १५० फुट खोल ड्रेजिंग करून केले जात आहे. या जेकब बार्जेसमुळे पारंपारीक मच्छिमारांना खाडीत जाळी लावणे व इतर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
ड्रेजिंगमुळे खाडीत प्रदुषण होऊन मासेमारीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्याकडून ठेकेदारांना कळविण्यात आलेले आहे की, प्रत्यक्षात काम सुरू करण्या अगोदर खाडीतील बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी. तसेच ठेकेदारांना काम करताना पोलिस संरक्षण दिल्याने मच्छिमारांवर दहशत निर्माण होईल असे वातावरण करून राजरोसपणे काम सुरू आहे.
यामुळे मच्छिमारांना आपला रोजगार गमवावा लागत आहे. मच्छिमारांमध्ये असंतोष निर्माण होऊन त्यांच्या सहनशिलतेचा उद्रेक होण्याअगोदर आपण सबंधित अधिकार्यांबरोवर खालील मागण्याकरिता व समस्या सोडविण्याकरिता मिटींग लावण्यात यावी. खाडीतील बाधित मच्छिमारांचा ताबडतोब सर्वे करण्यात यावा, तोपर्यंत सुरू असलेले काम बंद करण्यात यावे, नुकसान झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळावी, संबंधित विभागासोबात बैठकीचे आयोजन करुन मच्छिमाराच्या समस्यांचे निराकारण करावे, अशा मागण्या केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील करंजा-रेवस, रेवदंडा, साळाव, राजपुरी-दिघी या खाडीवरून रेवस-रेड्डी हा महामार्ग जात आहे. बाधितांना नुकसान भरपाई न देता ठेकेदार कंपनीने काही ठिकाणी खाडीत महाकाय अशा जेकब बार्जेसने सर्वेचे काम सुरू केले आहे. तर करंजा-रेवस खाडीत करंजा गावाचे बाजू कडून प्रत्यक्ष पुलाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक कोळी ग्रामस्थांनी दोन-तीन वेळा बंद पाडले होते मात्र तरीही काम सुरुच आहे. याअगोदर करंजा टर्मिनल हे बंदर ४०० एकर भर समुद्रात उभारण्यात आले आहे. परंतू बाधितांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही. आतासुद्धा अशीच साधक भीती ग्रामस्थांमध्ये आहे.