माणगावातील वाहतूक कोंडी फुटणार ? इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत चार पर्यायी रस्ते

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

By Raigad Times    12-Jun-2025
Total Views |
mumbai 
 
मुंबई | इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासाठी आवश्यक असणारा १५ कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना करण्याबाबतचा निर्णय बुधवारी (११ जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे इंदापूर, माणगावातील वाहतूक कोंडी फुटण्याची आशा निर्माण झाली आहे.
 
कोकणसह साउथला जोडणारा विकासाचा मार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या कामाची रखडपट्टी सुरु असून प्रवासी पर्यटकांना वनवास भोगावा लागत आहे. माणगाव व इंदापूर शहराला बायपास दिला गेल्याने तळ कोकणासह गोवा व साऊथकडील पर्यटकांना अंतर कमी झाल्याने कोकण व गोवादर्शन सहज घडवता येईल, अशी आशा होती; मात्र या बायपासचे काम यापूर्वी वनखाते व रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकल्याने बायपास कामाचे तीन तेरा वाजले होते. माणगाव व इंदापूर बायपासचे काम रखडल्याने दरम्यानच्या भागात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होते. या बायपास मार्गाचे काम गेली १४ वर्षांपासून रखडले आहे.
 
हा रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने, त्यातच वैयक्तिक मालकी जमिनीच्या काही मालकाना भूसंपादनाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले होते. त्यानंतर वनखात्याची मंजुरी मिळाली. मात्र निधी अपुरा पडत असल्याने व शासनाकडून वेळेवर निधी मिळत नसल्याचे कारण पुढे करीत पूर्वीच्या ठेकेदाराने हे काम सोडून दिले. पूर्वीचा ठेकेदार बदलला.
 
त्यानंतरही बायपासचे काम व रुंदीकरणाचे कामात म्हणावी तितकी गती मिळत नसल्याने माणगाव व इंदापूर बायपासच्या कामाचा तिढा कायमच राहिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोर्बा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात येईल.
 
ही कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बायपास, माणगाव बायपास रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
 
यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
१८ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामाची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिल्यानुसार, बुधवारी (११ जून) मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माणगाव, इंदापूर येथील वाहतूक कोंडी, पर्यायी मार्ग याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्गतर्फे निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले. या महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये जास्तीचे मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दक्षता घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.