कर्जत | जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जात आहेत. हात रिक्षा ओढणार्या रिक्षाचालक यांची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाने ई-रिक्षा चालवल्या जात आहेत. दरम्यान, या पर्यावरण पूरक वाहनातून मागील वर्षभरात तब्बल दोन लाख पर्यटक आणि स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांनी प्रवास केला आहे.
मात्र माथेरानमध्ये अमानवी प्रथा सुरू असून तब्बल ७४ हातरिक्षा चालक हे आजही माणसांना घेऊन रिक्षा ओढत आहेत. माथेरानमधील माणसांना माणसाने ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तब्बल १२ वर्षे लढा देण्यात आल्यानंतर माथेरानमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये प्रायोगिक तत्वावर पर्यावरण पूरक ई-रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर हातरिक्षा ओढणारे यांच्या हातात जून २०२४ मध्ये शासनाच्या वतीने पायलट प्रकल्प राबवून २० हातरिक्षा चालक यांच्या हातात ई-रिक्षा देण्यात आल्या.
हा पायलट प्रकल्प गेली वर्षभर सुरू असून माथेरानमध्ये २० ई-रिक्षा या दररोज सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांना सेवा देत आहेत. त्यातील माथेरानमध्ये दोन्ही शाळांचे ३५० विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याचे आणि शाळेतून पुन्हा घरी सोडण्याचे काम या ई-रिक्षा दररोज करीत आहेत. शालेय विद्यार्थ्यांची दररोज काही किलोमिटर चालण्याची प्रथा बंद करावी यासाठी या ई-रिक्षा चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
त्यामुळे त्यातील १५ ई- रिक्षा दररोज ३५० शालेय विद्यार्थ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या अल्पदरात सेवा देत आहेत. तर शहरातील कोणत्याही भागातील रुग्णांसाठी मोफत ई-रिक्षांची सेवा शासनाने देण्यास बंधनकारक केले आहे. त्याप्रमाणे मागील वर्षभरात ५९२ रुग्णांना ई-रिक्षाने सेवा दिली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना सेवा दिल्यानंतर सर्व २० ई-रिक्षा माथेरान शहरात स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांना ई-रिक्षा सेवा देत आहे. सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत या ई- रिक्षा दररोज सेवा देत असून त्यात चार्जिंग स्टेशनवर चार्जिंग केल्यानंतर पुन्हा सेवेत येत असतात. माथेरान शहरात ई-रिक्षा यांच्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली असून दहा जून २०२४ ते १०जून २०२५ या कालावधीत तब्बल दोन लाख स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी सेवा घेतली आहे.
हातरिक्षा चालक अजूनही प्रतीक्षेत
माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद करण्याच्या मागणीसाठी माथेरान मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू झाल्या. त्यानंतर दुसर्या पायलट प्रकल्पात माथेरानमधील २० हात रिक्षा चालक यांना ई-रिक्षा दररोज चालवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आजही ७४ हात रिक्षा चालक हे ई-रिक्षा यांच्यापासून वंचित आहेत. त्यामुळे काही दिवसांपूवी हात रिक्षा चालक यांच्याकडून उपोषण देखील करण्यात आले होते.
आम्ही माणसाने माणसाला ओढण्याची अमानवी प्रथा बंद व्हावी म्हणून सर्वोच्य न्यायालयापर्यंत धाव घेतली. अखेर न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असून आणखी ७४ हात रिक्षा चालक यांच्याकडे देखील निर्णय व्हावी अशी आमची मागणी आहे. -सुनील शिंदे, याचिका कर्ता