महाराष्ट्रात दारु महागली; तळीरामांची नशा उरतणार!

By Raigad Times    11-Jun-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | तळीरामांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. महाराष्ट्रात दारू महागली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार आहे.
 
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. उत्पादन शुल्क विभागाने मद्याचे दर वाढवले आहेत. १८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत वाढली आहे. देशी मद्य ८० रुपये, महाराष्ट्र मेड लिकर १४८ रुपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य २०५ रुपये तर, विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅण्डची किंमत ३६० रुपये इतकी झाली आहे. मद्य शुल्कवाढीसह सोबतच सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
 
विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात १२२३ पदे नव्याने भरले जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार आहेत. उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार आहे.