माथेरान | माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालविण्यात येत आहेत. मात्र अद्याप माथेरान मधील ७४ हातरिक्षा चालकांना ई रिक्षा चालविण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हातरिक्षा चालकांनी माथेरान शहरातील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू केले आहे. माथेरानमध्ये सध्या २० ई रिक्षा चालवल्या जात असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हातरिक्षा चालकांना अमानवी प्रथेतून मुक्त करण्यासाठी ई-रिक्षा चालविण्याचे धोरण न्यायालयाचे आहे.
मात्र माथेरान शहरातील ९४ पैकी केवळ २० हातरिक्षा चालकांना ई-रिक्षा चालवण्यास मिळाल्या आहेत. त्यात माथेरान दस्तुरी नाका ते हुतात्मा स्मारक माथेरान बाजारपेठ या अंतरासाठी प्रति माणसी ३५ दर आकारला जात असल्याने तीन ते चार माणसे ओढणार्या हात रिक्षामध्ये कोणीही पर्यटक बसत नाही. त्यामुळे गिर्हाईक मिळत नसल्याने शहरात पर्यटकांची ने-आण करण्यासाठी असलेल्या हातरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ई रिक्षा यांची संख्या वाढावी आणि पर्यटक तसेच स्थानिक नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूरव्हावी, अशी मागणी गेली वर्षभर सुरु आहे. मात्र एप्रिल २०२५ मध्ये सर्वो च्च न्यायालयाने राज्य सरकारला ई रिक्षाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. सदर अहवाल राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वो च्च न्यायालयात पोहचला आहे. मात्र न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे हात रिक्षाचालकांना ई रिक्षा चालविण्याची परवानगी मिळाली नाही.
त्यामुळे माथेरानमधील हातरिक्षा चालकांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी येथील श्रीराम चौक येथे उपोषण सुरू झाले असून या उपोषणाला माथेरान शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरातील शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख कुलदीप जाधव तसेच माथेरानमध्ये ई-रिक्षा आणणारे सुनील शिंदे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपोषणाला पाठिंबा देत तेथे बसून आहेत.