अलिबाग | महाराष्ट्र शासन व भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ या विशेष पर्यटक रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटचे माणगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सोमवारी (९ जून) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा रेल्वेच्या प्रवासाला सुरुवातकरण्यात आली. या विशेष रेल्वेचे माणगाव स्थानकावर आगमन झाले यावेळी खा. सुनील तटकरे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, माणगाव तहसीलदार दशरथ काळे, भारतीय रेल्वे पर्यटन मंडळ अधिकारी श्रीमती गुप्ता यांसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या विशेष रेल्वेमधून प्रवास करणार्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर रायगड जिल्हा प्रशासनाने पारंपरिक ढोल- ताशाच्या गजरात औंक्षण करून स्वागत केले.
तसेच पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यटकांना दुर्गराज रायगडची पर्यटनाच्या दृष्टीने माहिती देणारी घडी पुस्तिका वाटप करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पहायला, अनुभवायला मिळणार म्हणून पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषाने माणगाव रेल्वेस्थानक काही काळ दुमदुमून गेले होते.
एकूण १८ बसेसमधून हे सर्व पर्यटक रायगड किल्ल्यासाठी रवाना झाले. ५ दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेणार आहेत.