अलिबाग | रायगडच्या अनेक भागात सलग दुसर्या दिवशी बुधवारी (७ मे) वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत अवकाळी पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह सुटलेल्या जोरदार वार्यांनी अनेकांना धडकी भरवली. मात्र असह्य उष्णतेमुळे त्रस्त रायगडकरांना या सुखद गारव्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या पावसाचा दुबार शेतीसह वीजभट्टी व्यावसायिक, मंडप व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.
मंगळवारी दुपारनंतर आणि बुधवारी संध्याकाळी जिल्ह्याच्या काही भागात वादळी वार्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी शिडकावा झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मागील काही दिवस तापमानाचा पारा अगदी ३८.४० डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. तप्त उन्हाच्या झळा आणि अंगातून निघणार्या घामाच्या धारांनी जीव हैराण झाला होता.
यादरम्यान हवामान खात्याने उत्तर रायगडमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज अखेर खरा ठरला. मंगळवारी रोहा, कर्जत, पनवेल, अलिबागमध्ये तर बुधवारी अलिबाग, पेण, पनवेलमध्ये वादळी वार्यासह अवकाळी पावसाने दाणादाण उडवली. अलिबागमध्ये मंगळवारी रात्री ९ नंतर वादळी वार्यासह विजा चमकू लागल्या. ढग गडगडू लागले. काही भागात दमदार पाऊस झाला तर काही भागात केवळ शिडकावा झाला.
बुधवारीही दुपारपर्यंत हवामान स्वच्छ होते. मात्र सायंकाळी ४ वाजल्यानंतर काळे ढग दाटून आले. जोरदार वारा सुरु झाला. धुळीचे वादळ झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली. समुद्रकिनारी आलेल्या पर्यटकांनी पावसाच्या सरी अंगावर घेत आनंद लुटला. अलिबाग एसटी आगारात गाडीची वाट पाहत असलेल्या प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. काहींनी छत्र्या उघडल्या. मात्र जोरदार वार्यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.
वादळी वार्यामुळे काही वेळासाठी वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. तर काही ठिकाणी वीजेचे खांब उन्मळून पडल्याचे वृत्त आहे. या वादळी पावसाने आंबा आणि तोंडली पिकाची काही प्रमाणात हानी केली. पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. काही ठिकाणी झाडांची, पडझड झाली. दरम्यान, सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. रात्री अनेक ठिकाणी हळदी समारंभ सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे लग्नमंडपात जमलेल्या वराडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. तर आज संध्याकाळी झालेल्या पावसाने मंडपात जमलेले वधूवरांसह सगळेच पावसाने ओलेचिंब झाले. या पावसाने मंडप व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रायगडला यलो अलर्ट...दोन दिवस पावसाचे!
सध्या रायगड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.