पनवेलमध्ये शेकापला मोठे खिंडार! जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांचा शेकापक्षाला अखेरचा लाल सलाम

उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

By Raigad Times    06-May-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | अलिबागनंतर शेकापक्षाला पनवेलमध्येही अक्षरशः खिंडार पडले आहे. पक्षाचे प्रमुख नेते जे. एम. म्हात्रे आणि त्यांचे पूत्र प्रितम म्हात्रे यांनी पक्षाला शेवटचा लाल सलाम केला आहे. त्यांच्यासोबत शेकापचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक बुधवारी (७ मे) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. शेकापने महाआघाडीची साथ न सोडल्यामुळे हा निर्णय आपण घेत असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
 
सोमवारी (५ मे रोजी) जे.एम. म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. यावेळी अनेक आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाआघाडीसोबत राहून शेकापचे नुकसान होत आहे. उरणमधून प्रितम म्हात्रे यांना महाआघाडीतील घटक पक्षामुळेच झाल्याचे म्हात्रे यांचे मत आहे. त्यामुळे महाआघाडीतून शेकापने बाहेर पडावे, असा आग्रह जे.एम. म्हात्रे यांचा होता.
 
याबाबत त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे आपली खंत बोलूनही दाखवली होती. मात्र त्यांना अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे ते नाराज होते. रविवारीच त्यांनी आपण शेकापमध्येच असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र दुसर्‍याच दिवशी म्हणजे सोमवारी त्यांनी भाजपमध्ये जात असल्याचे सांगण्यासाठी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे म्हात्रे आणि शेकाप यांच्यात एका रात्रीत नेमके काय घडले? याची चर्चा सुरु झाली आहे.
 
पनवेलमधून यापूर्वीच रामशेठ ठाकूर यांनी शेकापला राम राम करुन अर्ध्यावर आणले होते. मधल्या काळात कर्नाळा बँक घोटाळ्यात अडकल्याने विवेक पाटील यांनी जेलमधून राजकीय सन्यास घेतला. बाळाराम पाटील यांच्या पराभवानंतर शेकापला पुन्हा एकदा धक्का बसला होता. आता पक्षाचे महत्वाचे नेते असलेले जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे पूत्र प्रितम यांनीही शेकापला अखेरचा लाल सलाम केला आहे. अलिबाग तालुक्यात पाटील कुटुंबातच फूट पडली. माजी आमदार पंडित पाटीलआणि त्यांच्या कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पनवेलमधील दोन महत्वाच्या नेत्यांनी शेकापला सोडले आहे. त्यामुळे पनवेलमध्ये उरली सुरली शेकाप अक्षरशः गुडघ्यावर आली आहे.
पूर्वाश्रमीच्या मैत्रीची राजकीय युती!
शेतकरी कामगार पक्षामध्ये २००४ पूर्वी माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे यांची मैत्री सर्वश्रुत होती. व्यवसायामध्येही त्यांनी अनेक ठिकाणी एकत्र काम केले. म्हात्रे नगराध्यक्ष असताना चार वर्षे ते सोबत होते. दरम्यान २००६ ला ‘ठाकूर विरुद्ध म्हात्रे’ असा सामना नगरपरिषदेच्या निवडणुकीत झाला. त्या ठिकाणी झालेला पराभव काही प्रमाणात म्हात्रे यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर दोन दशके राजकीय दृष्ट्या वेगळे असलेल्या दोन जुन्या मित्रांची जे.एम.म्हात्रे यांनी भाजपमध्ये काम करण्याचे ठरवल्यानंतर खर्‍या अर्थाने युती झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.