बारावीच्या परिक्षेत रायगडातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By Raigad Times    06-May-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | राज्यात बारावी परिक्षेचा निकाल सोमवारी (दि.५) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९४.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत ०.१७ टक्क्यांनी परिक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात घट झाली आहे. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.४९ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.९१ टक्के इतके आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी, मार्च २०२५ मध्ये इयत्ता बारावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल सोम मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. बारावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून २९ हजार ४९३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २९ हजार ४१७ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले.
 
यामधील २७ हजार ८४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ५६९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९४.६६ टक्के इतके आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल ९९.४८ टक्के तळा तालुक्याचा लागला असून, सर्वात कमी ८४.०९ टक्के निकाल श्रीवर्धन तालुक्याचा लागला आहे.