नवी मुंबई विमानतळावरुन... इंडिगो विमान भरणार पहिले उड्डाण!

पहिल्या दिवसापासून देणार १५ शहरांसाठी सेवा ; इंडिगो आणि अदानी यांचे संयुक्त निवेदन

By Raigad Times    29-May-2025
Total Views |
mumbai
 
मुंबई | नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो ही विमान कंपनी लवकरच व्यावसायिक उड्डाणे सुरू करणार आहे. इंडिगो आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड यांच्यात यासंदर्भात करार झाला असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. बुधवारी (२८ मे) इंडिगो आणि अदानी यांनी संयुक्त निवेदन जारी केले.
 
या निवेदनानुसार, अदानी समूहाच्या मालकीचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो ही पहिली विमान कंपनी असेल. या भागीदारीमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसर्‍या क्रमांकाची विमान वाहतूक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे निवेदनात म्हटले आहे. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्या दिवसापासून १५ हून अधिक शहरांसाठी १८ दैनंदिन उड्डाणे (३६ एअर ट्राफिक मॅनेजमेंट) सुरू होणार आहेत.
 
नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही संख्या वाढून ७९ दैनंदिन उड्डाणांपर्यंत (१५८ एटीएम) पोहोचेल. यात १४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. नोव्हेंबर २०२६ पर्यंत १४० दैनंदिन उड्डाणे होणार असून त्यापैकी ३० आंतरराष्ट्रीय उड्डाणे असतील. येत्या काळात आणखी काही विमान कंपन्यांसोबत करार होण्याची शक्यता आहे. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स म्हणाले, "नवी मुंबई विमानतळावरून उड्डाणे सुरू करणारी इंडिगो पहिली कंपनी असेल याचा आम्हाला आनंद आहे. ही भागीदारी दोन्ही बाजूंनी पूर्ण तयारी दर्शवते.
 
mumbai
 
या विस्तारामुळे प्रवाशांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे समर्पण दिसून येते. नव्या विमानतळावरून सुरू होणारी उड्डाणे प्रवाशांना परवडणारी, वेळेवर आणि त्रासमुक्त सेवा देतील.” अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल म्हणाले, ‘ ही भागीदारी नवी मुंबई विमानतळाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ट्रान्सफर हब म्हणून स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही एकत्रितपणे लाखो प्रवाशांचा प्रवास अनुभव बदलणार आहोत, त्यांना सोयी आणि उत्तम पर्याय उपलब्ध करून देणार आहोत.
विमानतळाची पहिल्या टप्प्यात क्षमता किती?
पहिल्या टप्प्यात नवी मुंबई विमानतळाची क्षमता दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी आणि ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची असेल. भविष्यातील विस्तारात ही क्षमता ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतुकीपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. एकूण १,१६० हेक्टरवर पसरलेले हे विमानतळ मुंबईसाठी ड्युअल-एअरपोर्ट सिस्टम आणेल.
 
यामुळे मुंबई विमानतळावरील गर्दी कमी होईल आणि प्रवासी सेवांमध्ये सुधारणा होईल. यात दोन समांतर धावपट्ट्या आणि ३,७०० मीटर लांबीची धावपट्टी आहे, जी मोठ्या व्यावसायिक विमानांना हाताळण्यास सक्षम आहे.