कर्जत | कर्जत आणि खालापूर तालुक्यात पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी कोणत्याही प्रकारची बंदी करू नये, असे पत्र आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकारी यांना दिले आहे. कर्जत तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले असून त्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असल्याने प्रशासनाने पावसाळी पर्यटन बंदी करू नये, अशी मागणी आमदार थोरवे यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यात पावसाळा सुरू होताच प्रशासनाकडून कलम १४४ लागू केले जाते आणि त्यामुळे पर्यटकांना पाणवठ्याच्या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात येते. याचा थेट फटका स्थानिक पर्यटनावर आधारित असलेल्या रोजगारास बसते. गतवर्षीदेखील कर्जत तालुक्यात पावसाळी पर्यटकांवर बंदी घालण्यात आली नव्हती. त्यावेळी प्रशासनाला सूचना करणारे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे बंद न आणता पर्यटकांच्या सुरक्षेचे योग्य नियोजन करण्याची ठाम मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत तालुक्यात पावसाळ्यात १४४ कलम लागू करून पर्यटनावर निर्बंध घालण्यात येतात. यामुळे स्थानिक तरुणांचे, हॉटेल, ढाबे, भाजीविक्रेते, दुग्ध व्यवसायिक यांचे मोठे नुकसान होत असते. कर्जत तालुका निसर्गसंपन्न असून संपूर्ण महाराष्ट्रातून विशेषतः पावसाळ्यात डोंगरदर्या, धबधबे, निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी कुटुंबासह पर्यटक कर्जतकडे वळतात. अशा काळात स्थानिक लोक पर्यटकांना जेवण, राहण्याची सोय, स्थानिक उत्पादने, भाकरी, भाजीपाला अशा माध्यमातून रोजगार मिळवतात.
आमदार थोरवे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, "१४४ कलम लागू करून बंदी घालण्यापेक्षा, स्थानिक प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.यासाठी आपल्या विभागाने विविध विभागांच्या बैठका लावून पर्यटकांची सुरक्षेवर भर द्यावा आणि आवश्यक असल्यास आपणदेखील बैठकीत उपस्थित राहून योग्य मार्गदर्शन करु असे सूचित केले आहे.प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत १४४ कलम लावले. परंतु आमदार थोरवे यांच्या मते हा पर्याय टाळण्यासारखा आहे.
योग्य नियोजन, सुरक्षा व्यवस्था, स्थानिक स्वयंसेवकांची मदत, वाहतूक नियंत्रण, आपत्कालीन सेवा यांचा समावेश करून पर्यटन सुरळीत ठेवणे शक्य आहे.यासाठी आमदार थोरवे यांनी रायगड जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात काही सूचना प्रशासनाला केल्या आहेत. त्यात पर्यटनावर बंदी घालणार्या १४४ कलमाच्या ऐवजी योग्य उपाययोजना कराव्यात.
याबाबत विचार विनिमय करण्यासाठी पर्यटन स्थळी व्यवसाय करणारे यांची बैठक आयोजित करावी. कर्जत प्रांताधिकारी यांच्या अधीन असलेली यंत्रणा त्वरित कार्यान्वित कराव्यात. स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पर्यटनाला चालना देण्या-वर भर द्यावा. अपघात होणार नाही असे फलक पावसाळी पर्यटनस्थळी लावावेत तसेच पर्यटकांना प्रत्येक पर्यटनस्थळाची, धबधबे, धरणे यांची माहिती द्यावी असे सूचित केले आहे.